रेडा -करोना सारखी महाभयंकर परिस्थिती, पाऊस यामुळे इंदापूर तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे. सध्य परिस्थिती एका वेगळ्या संकटाचे असताना आणि त्या विभागाचे प्रमुख इंदापूर तालुक्यात असताना देखील जनतेच्या प्रपंचावर जेसीबी, पोकलेन सारख्या उपकरणाचा घाला घालण्याचा सपाटा सरकारी अधिकाऱ्यांनी लावला आहे, असा घणाघात भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गोखळी, तरंगवाडी, अंथूर्णे आणि पिंपळे भागात ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता घर आणि शेती पिकावर केलेली अतिक्रमणाची कारवाईने जनता बेघर, भयभीत झाली आहे.त्यांचे संसार उद्ध्वस्त करणेबरोबर नसून त्यांना मदत करायला कोणी तयार नाही ही बाब जनतेसाठी गंभीर आहे.
संबंधितांची अतिक्रमणे अनेकवर्षांपासून आहेत तरीसुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी या गावावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ज्या कायदेशीर गोष्टी असतील त्या शासकीय पातळीवर सामोपचाराने सोडविता आल्या असत्या. अगोदरच संकटात असणाऱ्या जनतेवर संकट निर्माण केल्याने या भागातील जनता पुढील अनेक प्रश्नांनी चक्रावली आहे. याविषयी आपण वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.