मुंबई: महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा वाद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करत असून मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यात वादाचा काहीही विषय नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. ही बैठक सुमारे तासभर झाली. या बैठकीत कॉंग्रेसच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केले जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरले होते. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाराचा वैयक्तिक विषय नाही, असे थोरात यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणताही व्यक्तीगत मुद्दा नव्हता. तसेच कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांनी देशासाठी “न्याय्य योजना’ मांडली आहे. पण गरीब माणसाला काही मदत करता येते का हे पाहायला हवे, असेही थोरात यावेळी म्हणाले.