कराड -राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी दिली.
देशातील कोव्हिड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. 18 मार्चच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. करोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, शासनाने राज्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविला आहे. हा संसर्ग आटोक्यात येण्यास काही कालावधी लागणार आहे. रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशा वेळी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 मधील तरतुदीनुसार उच्च वा सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, अशा संस्था वगळून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका, आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर पुढील तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.