लखनौ – उत्तर प्रदेशात सरकारी सेवेत 69 हजार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यातील अनेकांना गजाआड करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचीच काल बदली करण्यात आल्याने उत्तर प्रदेशात नवीन वादंग निर्माण झाले आहे.
कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांनी याप्रकरणी योगी सरकारला धारेवर धरले आहे. सत्यार्थ अनिरूद्ध पंकज असे या बदली करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते प्रयागराज येथील जिल्हा पोलीसप्रमुख होते. त्यांना बदलीचे नवीन ठिकाणही कळवण्यात आलेले नाही पण सध्याच्या पदांवरून मात्र त्यांना हटवण्यात आले आहे.
त्यांनी याप्रकरणी आतापर्यंत 11 संशयितांची धरपकड केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका के. एल. पटेल नावाच्या प्रतिष्ठित व्यावसायिकाचाही समावेश आहे. ते अनेक शिक्षण संस्थांचे चालक आहेत. अशा घोटाळ्याच्या प्रकरणांमधील अधिकाऱ्यांना योगी सरकारने पूर्ण संरक्षण देणे अपेक्षित असताना त्यांनी या अधिकाऱ्यांचीच बदली केली आहे यातून सरकारचा खरा चेहरा उघड होत असल्याची टीका कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
या प्रकरणाच्या तपास कामात केलेल्या प्रगतीबद्दल प्रियांका गांधी यांनी सत्यार्थ पंकज यांचे अभिनंदनही केले आहे.