आळंदी(प्रतिनिधी) – माउलींचा पालखी सोहळा आज (दि. 13) सायंकाळी चार वाजता प्रस्थान ठेवणार आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा अलंकापुरीत माउली माउली गजर कानी पडलेला नाही. त्यामुळे यंदा आळंदीत फार चुकल्या चुकल्या सारखे वाटत असल्याचा अनुभव येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे साधेपणाने सायंकाळी चार वाजता प्रस्थान होणार आहे. हे प्रस्थान प्रथा-परंपरेप्रमाणे होणार आहे. तर माउलींच्या चल पादुका पुढील 17 दिवस मंदिरालगत असणार्या अजोळ घरी दशमीपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर सुवासिक फुलांनी सजवण्यात आले आहे. वीस मानकरी वारकरी यांना मंदिरात दुपारी तीन वाजुन दहा मिनिटांनी प्रस्थानसाठी आत प्रवेश दिला.
माउलींचा प्रस्थान सोहळा अवघ्या अर्ध्यातासावर आला असूनही मंदिर, परिसर आणि इंद्रायणी घाटावर केवळ निरव शांतता असल्याचे हे काही क्षणचित्रे.