ख्यातनाम गीतकार, पटकथा लेखक राजेंद्रकृष्ण यांची आज जयंती. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील जलालपूर जट्टान येथे 6 जून 1919 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव राजेंद्रकृष्ण दुग्गल. आठवीत असतानाच त्यांना काव्याविषयी आवड निर्माण झाली. ते आपल्या डायरीमध्ये चांगल्या कवितांची नोंद करीत असत. त्यांनी पाश्चात्य व उर्दू कवितांचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शिमला येथील नगरपालिका कार्यालयात लिपीक म्हणून रूजू झाले.
त्या काळात त्यांनी पूर्व आणि पाश्चात्य साहित्यिकांचे विस्तृतपणे वाचन केले आणि कविता लिहिल्या. त्यांनी पेंट, निराला, फिरक गोरखपुरी आणि अहसान दानीस यांच्या हिंदी व उर्दू कवितांचे रसग्रहण केले होते. त्या दिवसांत, दिल्ली-पंजाबमधील वर्तमानपत्रे कृष्णा जन्माष्टमीनिमित्त खास पुरवणीमधून काव्य स्पर्धा आयोजित करीत असत. त्यामध्ये ते सहभागी होत असत. त्या काळात शिमल्यात एक मोठा मुशायरा असायचा, त्यामध्ये हिंदुस्थानातील बहुतेक सर्व मोठे कवी एकत्र येत असत. तिथे त्यांनी त्यांची पहिली गझल वाचली. त्यानंतर जिगर मुरादाबादी यांनी मंचावर येऊन त्यांचे खूप कौतुक केले. त्यावेळी त्यांच्या मनात आले की नोकरी सोडून द्यावी व गीतलेखन करावे. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली आणि नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले.
वर्ष 1947 मध्ये त्यांना “जनता’ या पहिल्या चित्रपटाची पटकथा लिहायला मिळाली व त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या किशोर शर्मा दिग्दर्शित “जंजीर’ चित्रपटासाठी गीते लिहून गीतलेखनाचा श्रीगणेशा केला. त्या काळात अगोदर चाल व त्याप्रमाणे गीत अशी कल्पना फारशी रूढ नव्हती. त्यामुळे गीतकाराला स्वातंत्र्य असल्याने त्याच्या मनातील भाव गीतामध्ये येत असत. त्यामुळे गीताचा आशय व गोडी वाढत असे. महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर त्यांनी “सुनो सुनो ये दुनियावालों बापू की ये अमर कहानी’ हे गीत लिहिले. त्याला हुस्नलाल भगतराम यांनी संगीतबद्ध केले व मोहमद रफी यांनी गायले. या गाण्यामुळे ते भारतभर प्रसिद्ध झाले.
राजेंद्रकृष्ण यांना अश्वशर्यतींची खूप आवड होती. त्यांना एकदा सत्तरच्या दशकात घोड्यांच्या शर्यतीत 46 लाखांचा जॅकपॉट मिळाला व ते चित्रपटसृष्टीतील श्रीमंत गीतकार व पटकथालेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना हा अचानक धनलाभ झाला असला तरी ते त्यांच्या लेखनाने व प्रतिभेने श्रीमंत होतेच. राजेंद्रकृष्ण यांचेदेखील तमिळ भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांनी तमिळ चित्रपटांसाठी पटकथादेखील लिहिल्या आहेत. त्यांनी एव्हीएम स्टुडिओसाठी सुमारे अठरा तमिळ चित्रपट पटकथा लिहिल्या. त्यांनी जवळजवळ सर्व बड्या संगीत दिग्दर्शकांसह काम केले. तथापि, सी. रामचंद्र यांच्यासोबत चांगली जोडी जमली होती. त्यांची गाणी बहुतेक सर्व पार्श्वगायकांनी गायली असली तरी सुरैया, लता मंगेशकर, किशोरकुमार, मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांनी राजेंद्रकृष्णांची गाणी वेगवेगळ्या उंचीवर नेली. 23 सप्टेंबर 1987 रोजी त्यांचे निधन झाले.
– माधव विद्वांस