नगर -भिंगार छावणी मंडळाचा उपाध्यक्ष थेट जनतेतून करण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या विचारधीन असून, तसा बदल प्रस्तावित केला आहे. परंतु या निर्णयाबरोबर अन्य शहरातील जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षांप्रमाणे भिंगारच्या उपाध्यक्षांना सर्वाधिकार प्राप्त होणार का? की हा निर्णय भिंगारकरांना मधाचे फक्त बोटच दाखविणार असा सवाल भिंगार छावणी मंडळाचे उपाध्यक्ष व कॉंग्रेस अध्यक्ष ऍड. आर. आर. पिल्ले यांनी उपस्थित केला.
संरक्षणमंत्री ना.राजनाथ सिंह यांना भिंगार शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले असून, त्यात भिंगार छावणी मंडळ बरखास्त करुन तेथे नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खा.सुजय विखे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. भिंगार हा बहु लोकवस्तीचे शहर आहे. त्याचा सर्वांगिण विकास नगरपालिकेशिवाय शक्य नाही.
वास्तविक भिंगार या शहराला 600 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कॅन्टोंमेंटबोर्ड दुरुस्ती नियमात बदल करुन, लोकप्रतिनधींना कोणतेही अधिकार प्राप्त होत नाही. तसे या नव्या बदलामुळे ही फरक पडणार नाही. या निवेदनावर ऍड.आर.आर.पिल्ले, श्यामराव वाघस्कर, ऍड.साहेबराव चौधरी, सुभाष त्रिमुखे, रिजवान शेख, संजय झोडगे, निजाम पठाण, संतोष धीवर आदिंच्या सह्या आहेत.