नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये 8171 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तसेच 204 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत देशात एक लाख 98 हजार 706 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार हा काही राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 98 हजार 706 इतका आहे. तर 5598 लोकांचा मृत्यू झाला असून 95 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, देशातील एकूण बळींपैकी 94 टक्के बळी हे फक्त 8 राज्यात झाल्याची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण आणि 83 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यांमध्ये झाले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एकूण रुग्णांपैकी 75.33% रुग्ण ज्या 6 राज्यांमध्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश होतो. सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र, तमिलनाडु, दिल्ली आणि गुजरातमध्ये आहे. या राज्यांमध्ये दररोज वेगाने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.