नगर (प्रतिनिधी) – सव्वापाचशे वर्षापेक्षा अधिक काळखंडाचा वैभवशाली इतिहास असलेल्या शहराला गतवैभव प्राप्त करुन देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लाभलेला ऐतिहासिक वारसा हे या शहराचे वैभव असून, हा वारसा भविष्यात नवी दिशा देणारा ठरु शकतो. नवीन पिढीला आपल्या शहराचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. या दृष्टीने देखील काम होण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहराच्या 530 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, भूषण देशमुख, उबेद शेख, अन्सार सय्यद उपस्थित होते.उबेद शेख यांनी सव्वापाचशे वर्षापेक्षा अधिक काळखंडाचा इतिहास हा या शहराची ओळख आहे.
हा ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धनासाठी जागृक नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. यामध्ये खंड पडू दिला नसल्याचे हरजितसिंह वधवा म्हणाले. भुषण देशमुख व उबेद शेख यांनी उपस्थितांना अहमदनगर शहराच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देवून, बागरोजा येथील ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व व त्याच्या स्थापत्यकलेचे महत्त्व सांगितले.