शशिकांत भालेकर
पारनेर -जगातील काही देशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. करोनामुळे तसे शिक्षण आपल्या देशातील काही शहरांतील खासगी शाळांमध्ये दिले जाऊ लागले आहे. मात्र ग्रामीण भागात मात्र करोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे शहरी भागासारखे ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागातील सरकारी शाळांत का दिले जाऊ शकत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारतात तो फैलावत आहे. त्याचा फटका शाळा-महाविद्यालयांना बसला आहे. अगदी अंगणवाडीपासून ते शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. 15 मार्चपासून राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांना व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून अभ्यास दिला जातो, हे परिणामकारक असल्याचे दिसून येत नाही. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यास कितपत करत असतील, याबाबत साशंकताच आहे.
पालकांना देखील आता शाळा कधी सुरू होतील, याबाबत चिंता सतावत आहे. शासनाकडून शाळा सुरू करणे किंवा पुढील सत्र सुरू करण्याबाबत कुठल्या हालचाली होताना दिसत नाहीत. तसे करोना संपेपर्यंत शाळासुरू करणे हे घातकच ठरू शकते. त्याचा संपूर्ण नायनाट झाल्याशिवाय शाळा सुरू होतील, असे आता तरी वाटत नाही. म्हणून यासाठी ऑनलाईन शिक्षणपद्धत राबवली जावी, असा सूर शैक्षणिक जाणकारांकडून उमटत आहे
पुण्या-मुंबई येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते, या शाळा एक एप्रिलपासून सुरू आहे. तेथील शाळाही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत असून, नवीन वर्षाची सुरुवात 6 एप्रिल पासून झाली. ग्रामीण भागात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या संवादातून शिकवू शकतात. सध्या ग्रामीण भागात नेटवर्क उपलब्ध झालेली आहे. अँड्रॉईड मोबाइल घराघरांमध्ये आहेत. आणि तंत्रज्ञानाचे म्हणाल, तर पालकांपेक्षा विद्यार्थ्यांना मोबाईलमधील अधिक ज्ञान आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणपद्धती राबवली जाऊ शकते. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
शिक्षण विभागाने पुढाकार घेण्याची गरज
चालू शैक्षणिक वर्ष जून 15 च्या दरम्यान सुरू होत आहे. मात्र करोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एकत्रित शिकवणे सध्या शक्य दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची शिक्षण पद्धत सुरू करण्यासाठी प्रथम पालकांत जागृती करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू करण्याची चाचपणी करण्यासाठी वेळ आहे. त्याचा वापर शिक्षण खात्याने केला पाहिजे.