दिवे/फुरसुंगी (वार्ताहर) – वनविभागाला गुंगारा देत गेली काही महिने फुरसुंगी परिसरात फिरत असलेला बिबट्या आता दिवेघाटातही दिसू लागला आहे. दिवसभरातील वाढत्या उष्णतेमुळे बिबट्या रात्रीच्या वेळी बाहेर पडत असून घाटातील वर्दळीच्या दिशेने जात असावा, असा अंदाज लावला जात असून वनविभागाने घाटातील सुरक्षिततेच्या दृष्टीने बिबट्याला पकडावे, अशी मागणी होत आहे.
फुरसुंगी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मार्च महिन्यांत उघड झाले होते. सोनारपूल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे तसेच त्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याचे आणि पाळीव जनावरांवर हल्ले केले होते. तो आपल्या दोन पिल्लांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शाळकरी मुले, महिला व शेतकरी भयभीत झाले.
बिबट्या नरभक्षक होण्याआधी त्याला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाकडून परिसरात पिंजरेही लावण्यात आले होते; परंतु बिबट्या हाती लागला नाही. मार्च महिन्यांपासून फुरसुंगी परीसरात वावरत असलेला बिबट्या सावज शोधण्यासाठी रात्रीच्यावेळी आता दिवे घाटापर्यंत येत असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्व परिस्थितीचा अंदाज घेत मध्यरात्री निर्जनस्थळी जाऊन आपले सावज शोधून फडशा पाडत असल्याचे दिसून आले आहे. वाहनचालकांवर हल्ले करण्यापूर्वी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घाट परिसरात गस्त वाढवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी होऊ लागली आहे.