राजगुरूनगर -राजगुरूनगर एसटी बस आगाराने शनिवारी (दि. 23) तालुक्यात प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरु केली आहे. शनिवारी (दि. 23) व रविवारी (दि. 24) बसेस एकूण 765.2 किमी बसेस धावल्या असून उत्पन्न केवळ 440 रुपये मिळाले असून प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आणखी किती दिवस असा तोटा सहन करीत एसटी धावणार हे पाहवे लागणार आहे.
राजगुरूनगर एसटी बस आगाराने शनिवारी सरकारच्या नियम व अटीला अधीन राहून व त्या अमलात आणून बस सेवा तालुक्यात सुरु केली. वाडा, साबुर्डी, बहिरवाडी, दावडी, पाईट या तालुक्यातील तालुक्यात बस सेवा सुरु केली. या सर्व गावातील परिसरात एसटी बसच्या 10 फेऱ्या झाल्या. तर रविवारी 16 फेऱ्या झाल्या असून केवळ 11 प्रवाशांनी प्रवास केला. शनिवारी 270 तर रविवारी 170 रुपये उत्पन्न मिळाले आहे.
राजगरूनगर आगार हे मध्यवर्ती ठिकाण आहे. चाकण एमआयडीसी असल्याने येथे कामगारांची मोठी संख्या असते. नाशिक, पुणे आणि मुंबई येथून हे कामगार एसटी बसने प्रवास करून पुढे युपी, बिहार, मध्य प्रदेशात जा ये करत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत होते शिवाय त्याभागातील मोठ्या संख्येने नागरिक मुंबई पुणे आदी शहरात असल्याने उन्ह्याळ्याच्या सुट्टीत त्यांचा एसटी बसने प्रवास होत होता मात्र करोना च्या संकटामुळे यावर्षी एसटी महामंडळाच्या राजगुरूनगर आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
दोन महिन्यांत 5 कोटींचे नुकसान
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये राजगुरूनगर आगार हे सर्वाधिक उत्पन्न देणारे होते दोन महिन्यांत या आगाराला सुमारे 5 कोटी रुपयांचे एसटी महामंडळाचे नुकसान झाले. मुंबई आणि नाशिक औरंगाबाद आणि पुणे आदी ठिकाणी सर्वाधिक बसेस जात होत्या.
दोन दिवसांपासून वाडा, साबुर्डी, बहिरवाडी, दावडी, पाईट या परिसरात बस सेवा सुरु केली आहे. या दोन दिवसांत मिळालेले …रुपये उत्पन्न इतिहासातील सर्वांत कमी उत्पन्न आहे. काही नियम अटींशी अधीन राहून तालुक्यात एसटी बस सेवा सुरू केली आहे. पुढील आदेश आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
– रमेश हांडे, आगार प्रमुख, राजगुरूनगर