कर्जत (प्रतिनिधी) –तालुक्यातील राशीन येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या महिलेचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर त्याच मृत महिलेची सहा वर्षांची नात पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.22) सिद्धटेक येथील एका महिलेला त्रास होवू लागल्याने तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते. त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कर्जतमधील करोनाबाधितांची संख्या आता तीनवर गेली आहे.
ही महिला मुंबईहून सिद्धटेक येथे आली होती. आल्यानंतर लगेचच प्रशासनाकडून तिला क्वारंटाईन करण्यात आले. मात्र काही तासातच त्रास होऊ लागल्याने तिला 108 रुग्णवाहिकेने नगरला हलविण्यात आले. घशातील स्राव चाचणी घेतल्यानंतर तिचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
राशीन येथील तो परिसर सील करण्यात आला असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. शनिवारी आमदार रोहित पवार यांनी येथे येऊन नियोजन बैठक घेतली. ज्याप्रमाणे जामखेडमधून करोना घालवला तसाच राशीनमधूनही घालवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आदी उपस्थित होते. मुंबई, पुणे अशा शहरातून ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांमुळे कर्जत तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढलेला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून बाहेरगावहून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याबाबत हलगर्जीपणा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे करोनाचा धोका अधिक वाढत आहे. आरोग्य तसेच ग्रामपंचायतकडून केली जात असलेली सर्वेक्षणे निव्वळ कागदावरच होत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.