इंदोर – लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने अनेक मजूर तसंच नागरिक आपापल्या घरी पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करत आहेत. लेकराबाळांसह अख्ख कुटुंब उन्हातान्हात पायपीट करुन किंवा मिळेल त्या साधनाने आपल्या गावाच्या दिशेने निघाले आहेत. असचं एक हृदयविदारक दृश्य इंदोर येथील महामार्गावर पाहायला मिळाले, येथे लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या एका कुटुंबाकडे घरी जाण्यासाठी बैलगाडी तर होती पण एक बैल कमी होता. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अगदी महिलेला देखील दुसऱ्या बैलासोबत गाडीला जुंपावे लागले.
लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने हातावरचे पोट असल्याने जवळ पैसा नसल्याने व इतर दुसरे साधन प्रवासाकरिता उपलब्ध नसल्याने इंदोर मधील एका कुटुंबाला बैलगाडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण अडचण अशी होती की बैलगाडीला जुंपण्यासाठी दुसरा बैल त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी प्रत्येकाने क्रमाने काही अंतर बैलगाडी ओढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बैलगाडीच्या एका बैलाच्या स्थानी कधी महिला तर कधी पुरूष सदस्य जुंपले आणि बैलगाडी ओढत प्रवास सुरू केला. एक सदस्य थकला की दुसरा सदस्य गाडी ओढत त्यांनी गावाकडची वाट धरली.
या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, बैलगाडीत बसलेले दोन सदस्य हे त्याचे भाऊ आणि वहिनी आहेत. ते सर्व आज सकाळी महू येथून इंदोरच्या पत्थर मुंडला या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. बैलगाडी ओढण्याबाबत त्याने सांगितले की, आमच्या जवळ एकच बैल होता त्यामुळे आम्ही सर्व सदस्यांनी क्रमाक्रमाने बैलगाडी ओढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला तुम्ही पायी जाण्याचा निर्णय का घेतला नाही असा प्रश्न केला असता, त्या सदस्याने सांगितले की, या बैलाला आम्ही अशा वेळी एकटं सोडून देऊ शकत नाही. त्यामुळे काही ठराविक अंतर क्रमाक्रमाने बैलगाडी ओढत आम्ही गावी निघालो आहोत.