मुंबई: विधानपरिषदेच्या तिकिटावरून भाजपमध्ये चांगलेच अंतर्गत राजकारण पेटले आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मेधा कुलकर्णी हे भाजपचे मोठे नेते पक्षावर नाराज आहेत. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरतोय. तो खडसेंचा. कारण खडसे एकामागून एक राजकीय टीकेचे बाण सोडून भाजपला घरचा आहेर देत आहेत. दरम्यान त्यांनी काँग्रेसमधून ऑफर असल्याचे सांगितले.
या सर्व प्रकारावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. पाटील म्हणाले, नाथाभाऊ आमचे वडील आहेत. त्यांनी आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत माराव्या, पण त्यांनी घरची भांडणं जगासमोर आणू नयेत. नाथाभाऊंना खूप मिळालं. अजून मिळायला हवं. पण मिळालं नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत.
तसेच, नाथाभाऊंना किती द्यायचं? सातवेळा आमदारकी दिली, सुनेला खासदारकी दिली, मुलीला विधानसभेची उमेदवारी दिली, मुलालाही उमेदवारी दिली, त्यांना विरोधीपक्ष नेता केलं. आता त्यांनी पक्षामध्ये वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहावं असं केंद्राने विचार केला असेल, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच, पंकजा मुंडे समजूतदार आहेत, विधानसभेनंतर लगेचच परिषदेचं तिकीट केंद्राने नाकारले असेल. तर बावनकुळेंना तिकीट का मिळालं नाही याबाबत आम्ही हैराण असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.