नवी दिल्ली: गुजरातचे मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी विधानसभेवरील निवड रद्द करण्याच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
गुजरातमधील भाजपचे महत्त्वाचे नेते असणाऱ्या चुडासमा यांच्याकडून निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे मान्य करत उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांची निवड रद्दबातल ठरवली. त्या निर्णयामुळे चुडासमा यांच्याबरोबरच गुजरातमधील भाजप सरकारला हादरा बसल्याचे मानले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, चुडासमा यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
आपल्या आव्हान याचिकेवरील निकाल येईपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. गुजरातेत 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत चुडासमा ढोलका मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी अवघ्या 327 मतांच्या फरकाने कॉंग्रेस उमेदवार अश्विन राठोड यांना पराभूत केले. त्या निवडणूक निकालाला राठोड यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
चुडासमा यांनी निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला. निवडणूक आयोगाच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले. त्याशिवाय, टपालाद्वारे येणाऱ्या 429 मतांची मोजणी निवडणूक अधिकाऱ्याने अवैधपणे नाकारली, असे आरोप राठोड यांनी केले होते. त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने चुडासमा यांना दणका दिला. चुडासमा शिक्षण, विधिमंडळ कामकाज, कायदा आणि न्याय यांसारखी महत्वाची खाती सांभाळत आहेत.