मुंबई – आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याची बीसीसीआयची खुमखुमी अद्याप कायम असल्याचे समोर येत आहे. ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा रद्द होण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता बीसीसीआयला पुन्हा एकदा स्पर्धेचा उमाळा आला आहे.
करोनामुळे संपूर्ण जगात अनेक स्पर्धांना फटका बसला आहे. अनेक देशांत लॉकडाऊन केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने अन्य देशांपेक्षाही जास्त सहा महिन्यांचा लॉकडाऊन केला असून हवाई प्रवासावरही बंदी लावली आहे. तसेच परदेशातून आलेल्या सर्वांना 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागत आहे. अशा स्थितीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी सहभागी देशांच्या संघातील खेळाडूंना दोन आठवडे आधीच तिथे जावे लागेल. वस्तूस्थिती पाहता हे शक्य नाही, त्यामुळे ही स्पर्धाच संकटात सापडली आहे. 30 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियातील लॉकडाऊन संपणार असून 18 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
लॉकडाऊन संपण्यापूर्वीच तेथील सरकारला परदेशी व्यक्तींवर असलेली हवाई प्रवासाची बंदी उठवावी लागणार आहे. त्यानंतरच या स्पर्धेसाठी विविध देशांचे संघ तिथे जाऊ शकतील. मात्र, हे सर्व चित्र पाहता ही स्पर्धा देखील टोकियो ऑलिम्पिकप्रमाणे पुढे ढकलली जाण्याचीच शक्यता जास्त दिसत असल्याने बीसीसीआयने आयपीएलसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व सदस्यांनी अध्यक्ष सौरव गांगुली याच्यासह ऑनलाइन बैठक घेतली असून 17 तारखेला भारतातील लॉकडाऊनबाबत काय निर्णय येतो ते पाहून आयपीएलसाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवले जाणार आहेत.
ही स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यातच प्रायोजक, खेळाडू व आयोजक संघटनांनाही मोठे नुकसान होणार आहे. इतकेच नाही तर या स्पर्धेवर ज्यांचे पोट अवलंबून आहे त्यांना देखील फटका बसणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी बीसीसीआय येत्या काळात प्रसंगी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर दबाव आणून टी-20 विश्वकरंडक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करेल. ही स्पर्धा जर लांबणीवर टाकण्यात आली तर मात्र, त्याच कालावधीत आयपीएलचे आयोजन होऊ शकते.
सध्या करोनामुळे देशांतर्गत स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने तसेच प्रायोजकांनीही स्पर्धा सुरु होईपर्यंत करारातील रक्कम देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी जवळपास 50 टक्के कामगार कपात केली असून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलेही आहे. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक पुढे ढकलून मिळालेल्या विंडोत आयपीएल घ्यायची व त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेतून ऑस्ट्रेलिया आतापर्यंत झालेला तोटा भरून काढू शकेल. केवळ भारतीय संघाविरुद्धचीच मालिका त्यांना स्थैर्य देऊ शकते हे उघड असल्याने ते बीसीसीआयसाठी टी-20 विश्वकरंडक लांबणीवर टाकेल असेच स्पष्ट होत आहे.
बीसीसीआयच्या हातात सूत्रे…
आज जागतिक क्रिकेटमध्ये कोणतेही दोन संघ एकमेकांशी मालिका खेळले अगदी इंग्लंड व ऑस्ट्रेलियात होणारी ऍशेस मालिका जरी खेळविण्यात आली तरीही फार आर्थिक लाभ होत नाही. मात्र, दोन संघातील एक संघ जर भारताचा असेल तर आयोजक देशाच्या मंडळाला करोडो रुपयांचा लाभ होतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आजच्या घडीला तरी जागतिक क्रिकेटची सर्व सूत्रे बीसीसीआयच्या हातात आहेत. त्यामुळे त्यांनी दबाव टाकला तर प्रत्येक देश आपल्या ठरलेल्या मालिका देखील स्थगित करेल अशी स्थिती आहे.