मुंबई – करोनामुळे जागतिक क्रिकेटला प्रचंड आर्थिक फटका बसलेला असताना एकाच वेळी दोन संघ तयार करुन एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोन सामने खेळविण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. याचाच अर्थ आता संकटात सापडलेल्या जागतिक क्रिकेटला झालेला तोटा भरुन काढण्यासाठी बीसीसीआय सज्ज आहे.
जागतिक क्रिकेटमधील बिग थ्री गणले जात असलेले भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यासह क्रिकेट खेळत असलेल्या सर्वच देशांना करोनामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई करण्यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. जागतिक स्तरावर सर्व क्रिकेट स्पर्धा तसेच द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचंड आर्थिक लाभ देणारी आयपीएल स्पर्धादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय मंडळाला जवळपास 5 हजार कोटींचा तोटा होण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआय ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याने यंदा आयपीएल नाही झाली तरी ते तग धरु शकतात. पण दुसरीकडे इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांना दिवाळखोरीचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय संघ खेळला तरच त्या ठरावीक मालिकांना प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ एका देशाशी तर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील संघ दुसऱ्या देशाच्या संघाशी सामना खेळेल आणि विशेष म्हणजे पुढील काळात एकाच दिवशी दोन्ही संघाचेही सामने खेळवले जाऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत.
अमिरातीने दिला प्रस्ताव…
करोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल आमच्या देशात खेळवा असा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला दिला आहे. यापूर्वी श्रीलंका क्रिकेट मंडळानेही असाच प्रस्ताव दिला होता. यावर बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागले आहे.