नगर – बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा येथील विलगीकरण कक्षातून 144 क्वॉरन्टाईन नागरिकांना काल (ता. 24) निरोप देण्यात आला. मदरसाच्या विश्वस्त व स्वयंसेवकांनी क्वॉरन्टाईन नागरिकांना मास्कचे वाटप करुन करोनाच्या बचावासाठी घरा बाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर, आलमगीरसह शहरातील इतर भागातील 158 नागरिकांना बाराबाबळी मदरसाच्या विलगीकरण कक्षात 14 दिवसासाठी क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. यापैकी 14 नागरिकांना 18 एप्रिल रोजी सोडण्यात आले. उर्वरीत 144 नागरिकांना काल सोडण्यात आले.
या नागरिकांना पुढील 14 दिवसासाठी होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. यावेळी मदरसेचे आसिर पठाण, व्यवस्थापक सय्यद सादिक आत्तार, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, मौलाना कारी अब्दुल कादिर, मौलाना नाजीम, शाहिद पठाण आदी उपस्थित होते.
मदरसाचे मुख्य मौलाना गुलाम मुस्तफा म्हणाले, “”करोना हे संपुर्ण मानवजातीवर ओढवलेले संकट आहे. या संकटात सर्वांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. या महामारीचा कोणत्याही धर्म, जातीशी संबंध नसून, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.” करोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक लढा देत आहे. रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिम समाजबांधव प्रशासनाच्या नियमांचे पाळन करुन ही महामारी हद्दपार करण्यासाठी आपले योगदान देऊन घरातच रमजानची उपासना करणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ पत्रकार मन्सूर शेख यांनी व्यक्त केला.