मंचर – लौकी (ता. आंबेगाव) येथे दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतीकामे रेंगाळली आहेत. तरकारी मालाची खुरपणी करणे, पिकांना पाणी देणे आदी कामे रखडली आहेत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी पांडुरंग नाना थोरात व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झालेले मेंढपाळ राजेंद्र सुळे यांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यासाठी कळंब-राणूबाई मंदिरमार्गे मधलामळा येथे बाळासाहेब कानडे व संतोष थोरात हे चारचाकी गाडीतून चालले होते.
काळपट्टी येथे किराणा वस्तूंचे वाटप करून ते मधला मळ्यात राहणारे शिक्षक संतोष थोरात यांना घरी सोडण्यासाठी निघाले. गाडी पुढे गेली असता पश्चिमेकडील रस्त्याकडेच्या दाट झाडीतून एक बिबट्या रस्त्यावर आला.
त्यानंतर गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकताच तो उसाच्या फडात निघून गेला. त्यावेळी तुळशीराम पारधी व श्रीकांत थोरात हे कालव्यानजीक बाजरीचे राखण करीत होते. सायंकाळी बिबट्या कालव्याच्या पूर्वेकडील रस्त्याने भैरवनाथ मंदिराच्या डोंगराकडे जाताना दिसला.
बिबट्या दिसताच ते दोघे घराकडे निघून गेले. महावितरणने भारनियमनात बदल करावा. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी पांडुरंग थोरात, शंकर थोरात, राजाराम थोरात, पोपट थोरात, देवराम थोरात, रामचंद्र थोरात आदींनी केली आहे.