नवी दिल्ली : जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता भारतात हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या 20 हजार 471वर पोहोचली आहे. त्यामुळे हा आकडा देशाची चिंता वाढवणारा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता एकूण 15 हजार 859 लोक उपचार घेत असून 3959 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 652 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या 24 तासात 49 लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर 1489 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशात कोविड-19 च्या 15 हजार 859 लोकांवर उपचार सुरु आहेत, तर 3959 रुग्ण बरे होतं घरी गेले आहेत. यातील एक जण दुसऱ्या देशात गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार कोरोनाची बाधा झालेल्यापैकी 19 टक्क्यांहून अधिक जण योग्य उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांमध्ये 77 लोक परदेशी नागरिक आहेत.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5221 कोरोनाबाधित फक्त महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 2272, दिल्लीत 2156, राजस्थानमध्ये 1801, तामिळनाडू 1596 आणि मध्यप्रदेशात 1592 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.