बिजापूर – गावातल्या अन्य लोकांप्रमाणे तीही तेलंगणातील एका शेतात काम करायची. वय वर्षे केवळ 12. गरीबी हा मोठा शाप कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या वयात ती छत्तीसगढमधील आपल्या घरापासून दूर शेजारच्या राज्यात कामाला गेली होती. लॉकडाउन झाले. त्याला मुदतवाढही मिळाली. इतरांप्रमाणे तिचीही घालमेल झाली.
घरी परतण्याचा निर्णय तिने घेतला. कोणतेही वाहन नाही. मुख्य मार्गावरून जाता येत नाही. जंगलातली वाट तुडवण्याचा निर्णय तिने घेतला. दरमजल करत घरापर्यंत पोहोचली. घर म्हणजे तिचे गाव केवळ 14 किमी अंतरावर राहीलेले. पोटात असह्य वेदना होत होत्या. अखेर ती कोसळली….आणि गतप्राण झाली.
एखाद्या चित्रपटातील गरीबीलाही लाजवेल अशी ही घटना. यातल्या त्या चिमुडीचे नाव आहे. जामलो मकदम. जामलो शेजारच्या तेलंगणमधील एका शेतात कामाला होती. तिच्याबरोबर अन्य काही लोकही होते. करोनाचे लॉकडाउन वाढल्यामुळे त्या सगळ्यानी घरी परतण्याचा निर्णय घेतला. तेही चालत. वाहने नाहीत, जाण्याची परवानगीही नाही.
15 तारखेला ते 12 जण चालतच आपल्या घराकडे निघाले. जंगलातील बिकट वाट तुडवत त्यांचा प्रवास सुरू होता. मध्ये तिला त्रास होत होता. मात्र तरीही घरी पोहोचण्याचे लक्ष्य त्या सगळ्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अगदी हाकेच्या अंतरावर घर आले. मात्र तेथपर्यंत पोहोचण्याचे त्राण तिच्या शरिरात राहीले नव्हते. पोटातल्या वेदनांनी अखेर जामलोला गाठले. तिचा पुन्हा एकदा लांबचा प्रवास सुरू झाला.
घटनेचे वृत्त प्रशानाला कळले. ऍम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आणि तिचे ते निश्चिेतन शरीर तिच्या घरी नेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तिला उलट्या होत होत्या. पोटही दुखत होते. ती नीट खातही नव्हती, असे तिच्या बरोबर प्रवास करणाऱ्यांनी सांगितले. जामलोची करोना टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. शरीरातील इलेक्ट्रोलाईटसचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जामलोची माहिती उजेडात आल्यामुळे त्याची दाहकता समजली. मात्र रोज अशा काहीना काही गोष्टी समोर येत आहेत. करोनामुळे माणसे मरतील ही भिती आहेच. मात्र त्याही पेक्षा जास्त भिती भुकेने, नैराश्याने अथवा अस्वस्थतेने मरण्याची आहे. प्रशासनाने स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न सहानुभूतीने विचारार्थ घ्यावा असे ही घटना सांगून गेली.