नवी दिल्ली : देशभरात सुरु असणारे एकंदर धार्मिक वाद आणि धर्माच्या राजकारणावरुन काही अंशी दिसणारा असंतोष या साऱ्यामध्येच आता एका केंद्रीय मंत्रीमहोदयांचं वक्तव्य लक्ष वेधून जात आहे. अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी भारत जणू स्वर्गच आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे.
एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाची एकंदर पार्श्वभूमी पाहता धार्मिक नेतेमंडळी, धार्मिक आणि सामाजिक संस्था या सर्वांनी एकत्र येत मुस्लिम समुदायाला एक आवाहन केलं आहे की त्यांनी नमाज पठण, इफ्तार आणि इतर सर्व प्रकारच्या रुढी परंपरांचं घरातच पालन करावं आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं.
अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी जणू स्वर्गच असल्याच्या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला. ‘इथे त्यांचे (अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांचे) सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अधिकार सुरक्षित आहेत. जर कोणी काही पूर्वग्रह मनात ठेवून या देशाविषयी चुकीचं वक्तव्य करत आहेत, तर त्यांना या देशातील परिस्थिती पाहावी लागेल आणि त्याचा स्वीकारही करावा लागेल, असं नक्वी म्हणाले.