सध्या करोना विषाणूचे सावट समस्त भूमंडळावर असताना माझ्यासारख्या छोट्यात छोट्या व्यक्तीचा अपवाद असणे अशक्यच. त्याचमुळे खरंच खूप छान
स्वतःचीच स्वतःशी ओळख होत आहे. अरे मलाही येते की…! असे प्रश्न
स्वतःलाच विचारत उत्तरे मिळवत जाताना लक्षात येतो तो यासाठी लागणारा एकांत. मग यासाठी शब्दसुरांची साथ घेताना कानावर शब्द पडले,
“सखी मंद झाल्या तारका…
आता तरी येशील का?’
कवीच्या त्या तरल भावनांचा आविष्कार गाण्यातून रुंजी घालत होता. प्रियकराच्या त्या एकांताचा विचार मनास स्पर्शून गेला मग या एकाच शब्दाभोवती मन विचार करायला लागले.
अंतापेक्षा एकांतालाच माणूस जास्त घाबरतो, पण त्याची दुसरी बाजू ही सकारात्मकता देते. सध्याची ही परिस्थिती सततच्या धावपळीनंतर आपल्याला थोडासा एकांत हवा असतो, याची गोड जाणीव करून देणारी आहे. मग गोड आठवणींमध्ये मन रमू लागते अन् मनाची घालमेल करत स्वतःच्याच मनाला समजावणारा हा एकांत आपल्याच व्यक्तिमत्त्वात भर घालतो.
आताच्या या सोशल मीडियाच्या काळात आपण मनाने एकमेकांशी जोडले आहोत वेगवेगळी आव्हाने स्वीकारत नकळत स्वतःचीच ओळख स्वतःला व इतरांना करून देताना दिसत आहोत, ते या एकांतामुळेच ना….! प्रियकराला प्रेमाची ओढ लागते आणि आपल्या प्रेमाच्या भावविश्वात रंगून जाताना प्रेयसीच्या सुखद आठवणी देणारा एकांत क्षणभर का होईना त्याचे आयुष्य सुखावून टाकतोच.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला समृद्ध करून जातो. बालपणी हसताना, बागडताना हवा असलेला एकांत वेगळ्या गोष्टीकडे धाव घेणारा, तर तरुणपणी कोणाची तरी ओढ लावणारा, मध्यवयात काय मिळाले, काय घालवले याची गोळाबेरीज करणारा हा एकांत प्रत्येकवेळी काहीतरी देऊनच जातो. त्याच पुंजीचा वापर तो स्वतःच्या आत्मप्रगतीसाठी उपयोगी ठरतोय. मग एकांत म्हणजे एकटेपणा कसा होईल? अर्थात व्यक्तीनुसार त्याच्या कल्पना वेगवेगळ्या इतकेच.
आपले भावनिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी याची खूप गरज असते. सततच्या ताणामुळे निर्माण होणारी कोंडी फोडून मनाची प्रसन्नता टिकून राहते. एकांत आत्मचिंतनासाठी उपयोगी ठरतो. एकांत ज्याचा कधीच अंत नाही आपण येताना एकटेच येतो जाताना एकटेच जातो मग मधल्या या उजेडातल्या प्रवासाचा त्याला आधाराची गरज का लागते? असा विचारही येतो तो या एकांतामुळेच.
सुखदुःखाचा भास-आभास निर्माण करणारा एकांत, कवीच्या तरल भावना जागृत करणारा, चित्रकाराच्या कुंचल्याने रेघा मांडत आयुष्याची सहजता पटवून देणारा, लेखकाच्या लेखणीतून एखाद्याच्या आयुष्याला आकार देणारा दुवा ठरतो. मात्र, त्याची जाणीव मनाला हवी कारण मनातच सुख नसेल तर ते जगात कोठून मिळणार? मग हाच एकांत एक भयाण बीभत्स असे रूप धारण करून नको त्या आमिषांकडे झुकवू शकतो. यासाठी मनाची बैठक उत्तम हवी.
रोज थोडे-थोडे चालत जाणारी मुंगी मैलोन-मैल चालून जाते तसाच हा एकांत रोज थोडाथोडा आपल्याला घडवतो, खरा चेहरा होऊन जगवतो. समस्येपेक्षा मोठे होऊन सद्यपरिस्थितीत जगवतो हा एकांत. सुखी जीवनाचा मनाची मरगळ घालवणारा खात्रीशीर मार्ग हा सृजनशील एकांत जो शोधून ते परत मिळणार नाही त्याचा सकारत्मकतेने वापर करता येईल.
– मधुरा धायगुडे