साहजिकच आहे, गेले कित्येक दिवस घरातच आहोत आपण. कुटुंबात राहणं, कुटुंबीयांशी संवाद साधणं, सर्वांनी मिळून काम करणं, विविध पदार्थांचा, आईच्या/गृहलक्ष्मीच्या हातच्या जेवणाचा आस्वाद घेणं, लेकरांच्या सान्निध्यात कुठलेही ठसे नसणारं, निरागस अवकाश अनुभवणं, विविध फोटोंच्या साह्यानं बालपणापासूनच्या सर्व आठवणींचा आढावा घेणं, सगळ्या जिवलगांशी फोनवरून बोलणं…
खरंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण कित्येक वर्षे मुकलो होतो, जी शांतता, निवांतपणा अनुभवायला जीव कासावीस झाला होता ते अगदी अनपेक्षितपणे अवचित मिळालं! मग तरीही ही उदासी का दाटून यायला लागलीये हळूहळू?
मी, माझे कुटुंब, माझे नातलग म्हणजे माझे प्रिय अवकाश आहे, अगदी निःसंशय! पण केवळ एवढंच अवकाश आहे काय माझं? या इवल्याशा अवकाशाबाहेर असणारा अथांग समुदाय म्हणजेसुद्धा मी आहे! या ऊर्जस्वल सामूहिक अस्तित्वाचा मी अविभाज्य भाग आहे. या महाकाय समुदायात एकमेकांशी संवादताना, शब्दांतून, कृतींतून जे काही होत असतं त्या साऱ्यामध्ये आपणच तर व्यक्त होत असतो! आपणच तर असतो या साऱ्यांत सामावलेले!
व्हाटस्ऍप, फेसबुक समाजमाध्यमांत आपण व्यक्त तर होतो, पण कागदाच्या फुलांना जसा अंतरीचा सुगंध नसतो तसं या आभासी जगाने प्रत्यक्ष समूहजीवनाची अनुभूती, समाधान कसं बरं मिळावं? या सामूहिक अस्तित्वाला पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आपण अधीर झालो आहोत! पण थांबा! मातृनिसर्गाच्या संकेतांपुढे थोडे विनम्र होऊया, कान देऊन ऐकूया.
खरंच झालीय का सगळी डागडुजी? झालंय का सगळं सांधून, दरपून-निरपून? की फक्त एखाद्या जलाशयातला वरवरचा पालापाचोळा गोळा करून झाल्यावर, गाळ खाली बसून जसं स्थिरावलेले पाणी नितळ दिसावं तसं वाटतंय? आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक अस्तित्वाच्या अगदी तळाशी असणारा जडशीळ गाळ अजून उपसायचा बाकी तर नाही? आपल्या जगण्याची परीक्षा घेणारी ही तगमग सोसून खोल डुबकी मारावी लागेल अन् गच्च बसलेला जड गाळ उपसावा लागेल.
याला कुणी मूलगामी चिकित्सा म्हणेल, मर्मस्थानाची शस्त्रक्रिया म्हणेल, कुणी गाभ्याशी भिडणं म्हणेल, तर कुणी अनमोल खजिन्याच्या चोरकप्प्याची छाननी म्हणेल. नाव काहीही द्या पण ‘हे करणं अगत्याचं आहे’ हे आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे उमगलेलं असतं; पण नेहमीप्रमाणे आपण ठोकळ सामान आवरतो अन् इतकं महत्त्वाचं पण किचकट, गुंतागुंतीचं, निगुतीनं करायचं काम बाजूला ठेवतो; ‘खास वेळ काढून मग त्याकडे बघू’ असं म्हणून! असा वेळ अन् धैर्य क्वचितच गोळा होतं!
तेव्हा बाकीची कपाटं अन् कप्पे आवरून झाले असतील तर ते बंद करूया, अन् या तळाच्या/गाभ्याच्या कामाकडे वळूया. सांगाडा दुरुस्त झाल्याखेरीज त्याभोवती रचल्या जाणाऱ्या पार्थिव मालमसाल्याचा, काय उपयोग!
पण म्हणजे काय करायचं?
काही नाही. जेव्हा जसा येतोय एखादा मूलभूत विचार, तेव्हा त्याच्यासाठी स्वतःला उपलब्ध करून देऊया. आपला शांत अवकाश त्याच्यासाठी मोकळा ठेऊया. टीव्ही, व्हाटस्ऍप, गाणी इ. इ. बाजूला सारून शांत राहूया. एकावेळी एक विचार-एक कल्पना-एक चिंतन. हे घटक आपल्याला हळू साद घालत असतात, श्वासांची लय मंदावून त्याकडे अगत्याने, आस्थेने लक्ष देऊया, त्यावेळी जे काही जाणवतंय त्याशी प्रामाणिक राहून संपूर्ण स्वीकार करूया. कारणंही कळतील, परिणामही कळतील अन् उपायही!!! मग त्यानुसार कृती करण्याचं धैर्य आपल्यात नक्कीच गोळा होईल सगळ्या चराचरातून….
अनादी काळापासून खूप मोठा प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. कसं आयुष्य हवं, कसं जग हवं हे आपल्या प्रत्येकाला अगदी नक्की माहीत आहे आणि तो आपल्या सर्वांचा मूलभूत हक्क आहे. आपल्याला हवं असणारं प्रेमानं, शांततेनं, समृद्धीनं भरलेलं विश्व निर्माण करणं आपणा सर्वांच्याच तर हातात आहे.
ही सामूहिक इच्छा वृद्धिंगत होण्याचं ऍप आहे – हृदय! म्हणून हृदयाचं ऐकूया! चला, वैयक्तिक हृदय, सामूहिक हृदय, वैश्विक हृदय… साद घालतंय आपल्याला….
– अंजली रसाळ (ढमाळ)