लातूर : लातूरकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. लातूरमध्ये आलेल्या बारा यात्रेकरुंना लॉकडाऊनमध्ये प्रवास करताना अडविण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले होते.
गेल्या 48 तासातील दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय टीमने सुटकेचा श्वास सोडला आहे. यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे.
संबंधित यात्रेकरू हे मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. पण, धार्मिक कार्यक्रमानिमित्त ते लातूरच्या निलंगा तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांची तपासणी केली असता, त्या 8 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संबंधित यात्रेकरू आणखी कोणाच्या संपर्कात आले होते, त्यांचीही तपासणी केली होती. दरम्यान, या आठही जणांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि सर्व यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमाने या आठही जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या यात्रेकरूंना लवकरच आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठवले जाणार आहे.