मुंबईमधील वकिलाकडून याचिका दाखल ः 190 लाख कोटींच्या भरपाईचा दावा
मुंबई : करोना व्हायरसमुळे जगभरात सध्या अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनला जबाबदार ठरवत आहेत. त्यातच आता अंधेरीतल्या एका वकिलाने चीन विरोधी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे.
आशिष सोहानी असे या वकिलाचे नाव आहे. त्यांनी चीन विरोधात खटला दाखल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात धाव घेतली आहे. चीनने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलली नाही. तसेच आपल्या सीमेबाहेर करोनाचा फैलाव होऊ दिला, असे आरोप आशिष यांनी याचिकेतून केले आहेत. 33 पानांच्या या याचिकेमध्ये त्यांनी भारत सरकारच्या वतीने चीनकडे भारतीय चलनात 190 लाख कोटी रुपयांची मागणी केली आहे.
आशिष सोहानी यांनी 11 मे रोजी आशिष यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टात ई-याचिका दाखल करण्यासाठी पाठवली. तीन दिवसांनी त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून याचिका विचाराधीन असल्याचा मेसेज आला आहे. याशिवाय आशिष यांनी सर्वोच्च न्यायालयतही चीन विरोधात याचिका दाखल केली आहे.
चीनशिवाय सोहानी यांनी याचिकेमध्ये त्या देशातील राष्ट्रीय आरोग्य आयोग, हुबेई प्रांत सरकार आणि वुहान महापालिकेचे नावही घेतले आहे. चीनमधील आरोग्य आयोग आणि महापालिकेने मानवतेविरोधात गुन्हा करणारी कृती केली आहे, असे आशिष सोहानी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आशिष सोहानी यांची आई मुंबई फॅमिली कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आहेत. हा व्हायरस किती भयंकर आहे, त्याची चीनला पूर्ण कल्पना होती आणि त्याचे पुरावे देखील आहेत. तरीही त्यांनी सुरुवातीच्या स्टेजमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार काही केले नाही, असे आशिष यांचे म्हणणे आहे.