शिक्रापूर (वार्ताहर) -येथील औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या व मोठ्या अशा एंकाई कास्टलाय कंपनीला आज (सोमवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे लोट चार ते पाच किलोमीटरपर्यंत दिसून येत होते. प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. वाघोली व रांजणगाव गणपती येथील अग्निशमक बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
कंपनीचे एचआर व्यवस्थापक राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता कंपनीमध्ये लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून यामध्ये अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. एंकाई कास्टलाय या कास्टिंग वस्तू बनविण्याच्या कंपनीतील एका काम सुरू असलेल्या युनिटला अचानक आग लागली आणि आगीचे लोळ सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत दिसू लागले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण भालेकर, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, अंकुश चौधरी, अविनाश पठारे, हेमंत इनामे, माजी सरपंच रामराव सासवडे, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एक आणि वाघोली येथील पीएमआरडीएचे दोन अग्निशामक बंब बोलाविण्यात आले. तसेच कंपनीमध्ये असलेल्या अग्निशमक यंत्रांच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा साठा असल्यामुळे कामगारांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते. बाजूला मनुष्यवस्ती आहे त्यामुळे येथील मनुष्यवस्तीत देखील घबराट पसरली होती.
कंपनी प्रशासन खबरदारी केव्हा घेणार?
एंकाई कास्टलाय कंपनीमध्ये यापूर्वी देखील काही दुर्घटना घडलेल्या आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये देखील याच कंपनीमध्ये आग लागलेली होती; परंतु वारंवार अशा घटना होऊन देखील कंपनी प्रशासन शांत आहे. त्यामुळे कंपनी प्रशासन खबरदारी केव्हा घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मी स्वतः घटनास्थळी जाऊन आलो असून, महावितरणच्या तारा कंपनीच्या कंपाऊंडच्या बाहेरून आहेत. कंपनीतील आगीचा महावितरणच्या तारांशी काहीही संबंध नाही.
-नितीन महाजन, उपकार्यकारी अभियंता महावितरण