वालचंदनगर – करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढू लागला आहे. त्यामुळे सध्या कळंब गावात परदेशातून, परराज्यातून आणि पुणे मुंबई आदी शहरांमधून नव्याने कळंब गावात आलेल्या 136 जणांना होम क्वारांटाइन करण्यात आले आहे. त्यांना घरीच थांबण्याची सक्ती केली आहे, अशी माहिती कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या कळंब गावात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरीही गावातील तरुण बेफिकीरपणे गावात चौकात मोकाट फिरत आहेत. काही ग्रामस्थांना गांभीर्य नसल्याचे मत पोलीस अधिकारी मोहन फाळके यांनी व्यक्त केले. आरोग्य उपकेंद्रातील आशा स्वयंसेविकांनी कळंब गावातील 1975 कुटुंबाचे सर्वेक्षण केले आहे.
गावामधील 136 जणांना होम क्वारांटाइन केले आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड आदी भागातून एकजण दक्षिण आफ्रिका तर एकजण जम्मू काश्मीर येथून आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारला असून त्याला बाहेर फिरण्यास मनाई केली आहे.
कळंब गावातील अशोकनगर, नारळीबाग, गुलमोहर सोसायटी, कळंब गावठाण, इंदिरानगर मल्हारनगर लालपुरी आदी भागात सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती कृषी सहायक अशोक मिसाळ यांनी दिली. यावेळी आरोग्य सहायक व्ही. ए. मदने, व्ही. सी. पापत, आरोग्य सेवक संदीप एकतपुरे, आरोग्य सेविका वैशाली राक्षे, ग्रामपंचायत कर्मचारी मोहसीन काझी, दत्तात्रय घोडके, शिवाजी चव्हाण, आशा स्वयंसेविका रेश्मा कुचेकर, राणी काटकर, ज्योती चव्हाण, माया चव्हाण, धनश्री राऊत, छाया अवघडे, रुकसाना आळंद, सुजाता गायकवाड, निर्मला सोलनकर आदींनी परिश्रम घेतले.
ग्रामपंचायत अलर्ट
कळंब गावात वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने पत्रके वाटप करण्यात आली असून ग्रामस्थांनी देखील आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत सरपंच उज्ज्वला फडतरे व ग्रामविकास अधिकारी पी. के. घोगरे यांनी दिली.