मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
तसेत राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी यावेळी दिल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.