नुकताच माझ्या मामे सासऱ्यांचा माझ्या सासूबाईंना फोन आला. कितीवेळ झाला तरी समोरून मामांच्या फक्त रडण्याचाच आवाज येत होता, त्यांना बोलताच येत नव्हतं. सासूबाई आणि आम्ही दोघंही पार घाबरून गेलो आणि मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. ह्या करोना व्हायरसमुळे आधीच आपण हतबल झालो आहोत आणि त्यात हा असा फोन. सासूबाईंनी त्यांच्या मुलाला फोन द्यायला सांगितला, आणि कळलं की मामांना त्यांच्या आईची खूप आठवण येत आहे.
मामांचे वय साधारण 80 च्या आसपास आहे, ह्या वयात कोणताही माणूस हा जास्त हळवा होतो आणि या आज निर्माण झालेल्या विचित्र वातावरणात तर जास्तच. का यावी पण अचानक मामांना त्यांच्या आईची आठवण? तर आईंचे फोनवर बोलणे झाल्यावर सर्व काही उलगडले.
आपल्याला 21 दिवस लॉकडाऊन मध्ये राहावे लागत आहे, ते ही स्वतःच्याच घरात, आपल्या माणसांसोबत, तरीही अगदी तुरुंगासमान भासत आहे. कधी हे दुष्टचक्र संपेल याचीच वाट बघत आहेत सगळे. ना कुठली करमणूक की बाहेरचे फिरणे, हॉटेलिंग, शॉपिंग काही काहीच नाही आणि त्याकाळी त्यांची आई तर हे काहीही नसताना केवळ आणि केवळ घरच्या माणसांसाठीच आनंदाने सर्व काही करत राहिली.
तिचे विश्व म्हणजे तिचे घर आणि घरातील सर्व माणसं. आणि त्यावेळी घरात माणसं तर किती असावीत तर 20 ते 25. हो. कारण तो काळ होता एकत्र कुटुंबाचा. तीन चार सख्खी, चुलत भावंडं, त्यांच्या बायका, त्यांची मुलं आणि त्यावेळी साधारणपणे प्रत्येक घरात परत आलेली एखादी विधवा बहीण, तिच्या मुलांसमवेत.
घरातल्या सगळ्याच स्त्रिया तेव्हा स्वयंपाकघरात स्वतःला वाहून घ्यायच्या, पण कुटुंबप्रमुखाच्या बायकोवर सर्वात जास्त जबाबदारी आणि जी स्त्री कामं करणारी असते तिच्यावरच सर्व कामाचा बोजा पडायचा. त्यात जावेच्या माहेरचे, इतर नातेवाईक हे मुक्कामालाच येत असत.
सासूबाईंचे माहेर म्हणजे एक हक्काचे घर आणि त्यांची आई हे हक्काचे माणूस वाटायचे तेव्हा प्रत्येकाला. कुठलीही अडचण असो सगळे त्यांच्याकडेच मदतीसाठी येत. एक मायाळू, मूर्तिमंत समाधान घेऊन वावरणारी आणि दाता हात असलेली ही माऊली दुसऱ्यांसाठी करताना कधीच थकायची नाही. तेव्हा ना कुठे बाहेर जाणे असायचे, ना कुठे फिरणे असायचे.
सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाकघर, माजघर, पडवी आणि अंगण असाच प्रवास असायचा त्या माऊलीचा. कधी कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट नाही की काही मागणेही नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मनातसुद्धा समाधान होते. त्यांची कुठलीही तक्रारसुद्धा नव्हती की किती कामे करावी लागतात, किंवा मी दमले अशी. बोलण्यातही तेच समाधान आणि गोडवा होता त्यांच्या.
तेव्हा सासूबाई आणि त्यांची भावंडंही समाधानीच होती, कारण त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार आणि आपल्या जगण्यातून दिलेली शिकवण प्रत्येकाच्या अंगात मुरली होती.
मला तर सासूबाई अनेकवेळा गप्पा मारताना त्यांच्या बालपणीच्या सुंदर आठवणी सांगतात. आम्ही भावंडं किती समाधानी होतो, सुखी होतो आणि हेच समाधान घेऊन मामे सासरे काय किंवा सासूबाई काय अजूनही आनंदी जीवन जगत आहेत. इतकी सगळी सुखं आपल्यापाशी असताना आपण का नाही आहोत मग सुखी? विचारायला हवंय आपणच आपल्याला, नक्कीच सापडेल उत्तर.
माझ्या मामे सासऱ्यांचे हेच 100 वर्षे जुनं, पण सुख आणि समाधानाने भरलेलं (आणि भारावलेलं) घर कल्याणच्या आग्रा रोडवर अजूनही दिमाखात उभं आहे.
-मानसी चापेकर