सामान्य नागरिकांना चढ्या भावाने घ्याव्या लागताहेत वस्तू ः पूर्व हवेलीतील परिस्थिती
नफेखोर दुकानदारांनी “त्या’ आदेशाला फासले हरताळ
दुकानदारांना पकडून दिले तरी कारवाई होत नसल्याच्या तक्रारी
सोरतापवाडी -करोना व्हायरसमुळे देशात मोठे संकट उभे राहिले आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सध्या काही प्रमाणात जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत होत नाही याची कल्पना सर्वांना आहे. मात्र त्यामुळे काही व्यावसायिक नफेखोरी करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यावर अंकुश राहिला नसून अनेक चीजवस्तू या चढ्या भावाने विकल्या जात आहेत.
सर्व दुकानदारांना आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवून नफे खोरी न करता माणुसकी म्हणून ग्रामस्थांना जादा दराने वस्तूची विक्री करू नये. अनावश्यकपणे मालाचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, तसेच प्रत्येक ग्राहकाला किराणा वस्तूचे बिल देण्यात यावे.असे पत्रक पूर्व हवेलीतील सर्व ग्रामपंचायतींनी काढून दुकानदारांना दिले.
मात्र हे पत्रक काही नफेखोर दुकानदारांनी कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिले आहे. मोठमोठ्या ग्रामपंचायत हद्दीत असे अनेक जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार चालू असून. नागरिक, पोलीस प्रशासन व पत्रकार यांनी दुकानदारांना पकडून दिले तरी महसूल खाते त्यांच्यावर कारवाई करण्यास हात आखडता घेत आहेत. यावरून कोणी हात आखडता घेतला व कोणी किती मोठा हात पुढे केला याचे उत्तर सामान्य नागरिकांना मिळत नाही.
जीवनावश्यक वस्तू जादा दराने विकत असल्याचे स्टिंग ऑपरेशन करून सुद्धा महसूल विभाग दुकानदारांना नुसती नोटीस देऊन सोडत आहे. अनेक ग्रामपंचायतीनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी भाऊसाहेब जाऊन काहीतरी करून नुसती नोटीस बजावत आहेत.
विचारले की सांगतात, वरिष्ठांचा आदेश आहे कारवाई नको नोटीस द्या. मग एवढा खटाटोप कशासाठी? कोण आहेत हे वरिष्ठ अधिकारी व का सांगत आहेत फक्त नोटीस पाठवा? या प्रश्नांने सामान्य माणूस पार रसातळाला जाणार हे मात्र नक्की. मग एवढ्या स्टिंग ऑपरेशनने कुणाची किमंत (पत) वाढली हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. अशा गोष्टींमुळे जनतेची अशीच पिळवणूक होणार, हे मात्र नक्की झाले.