नवी दिल्ली: मोदींच्या नियंत्रणात पंतप्रधान राष्ट्रीय मदत फंड (पीएम नॅशनल रिलिफ फंड) हे स्वतंत्र खाते अस्तित्वात असताना आणि त्यात तब्बल 3800 कोटी रूपये शिल्लक असताना कोरोनाच्या मदतीसाठी पीएम केअर हा वेगळा ट्रस्ट आणि वेगळे खाते निर्माण करण्याची काय गरज होती असा सवाल कॉंग्रेसने मोदी सरकाराला विचारला आहे.
कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे की, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या ट्रस्टचे नियम आणि खर्चाच्या संबंधातील निर्णय प्रक्रिया संदिग्ध आहे. लोकांना त्याविषयी कोणतीही माहिती नाही. पीएम नॅशनल रिलीफ फंड म्हणजेच पीएमएनआरएफ अस्तित्वात असताना त्या ऐवजी दुसरा ट्रस्ट स्थापन करण्याऐवजी याच रिलिफ फंडाचे नाव पीएम केअर्स असे केले असते तरी चालले असते असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान हे साऱ्या देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांना हे अनावश्यक पाऊल उचलण्याची गरज का भासली याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे असेही थरूर यांनी नमूद केले आहे. असाच आक्षेप कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत फंडात 3800 कोटी रूपये पडून आहेत असे असताना त्यांना हा दुसरा निधी व वेगळे खाते निर्माण करण्याची गरज का भासली याची माहिती लोकांना मिळालीच पाहिजे. पंतप्रधानांनी मदत गोळा करण्यासाठी पीएम केअर नावाने जर नवीन ट्रस्ट स्थापन केला असेल तर त्या संस्थेवरील अन्य ट्रस्टी कोण आहेत? हेही जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.