संगमनेर: कोरोना व्हायरसमुळे जगभरात ११ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. एकट्या चीन आणि इटलीमध्ये सहा हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. १७० देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूच्या आवरणाखाली २.५ लाखाहून अधिक लोक आहेत. हा विषाणू भारतातही झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उद्या जनता कर्फ्यू घोषित केला आहे. नेते, अभिनेते जनतेला घरीच राहण्याचे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करीत आहेत. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी देखील जनतेला घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी करोना संदर्भात जे आवाहन केले आहे त्यास सर्वांनी सहकार्य करा. आपलं गाव, आपलं शहर, आपला देश या संकटातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून हा सर्वांचा लढा आहे.
राज्यात ६३ जणांना करोना सारख्या आजाराने बाधित केलेले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे व ती अत्यंत गरजेची बाब आहे. सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन इंदोरीकर महाराजांनी केले.