पुणे-सोलापूर महामार्ग उठतोय भिगवणकरांच्या जीवावर
भिगवण – येथील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर दोन अपघात घडले. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे.
येथील दिलबहार हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अकबर हुसेन शेख (वय 56, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला तर सुजित जयेंद्र देवकर (वय 25, रा. अकलूज, ता. माळशिरस) हे गंभीर जखमी झालेले आहेत. येथील हॉटेल दिलबहार समोर उभ्या असलेल्या या दोघांना महामार्गावर पुण्याकडून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली होती. तसेच स्वामी चिंचोली (ता. दौंड) या गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात आदेश किरण वाघ (वय 25, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) याचेही निधन झाले होते.
महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवास सुखकर व जलद झाला असला तरी स्थानिकांसाठी हा मार्ग मात्र मृत्यूचा सापळाच बनला आहे. स्थनिकांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत आहे. भिगवण गावाच्या मध्यातून पुणे-सोलापूर महामार्ग गेल्याने महामार्गालगत नेहमीच गर्दी असते. मुख्य रस्त्यावर प्रवेश कराण्यासाठी अथवा महामार्ग ओलांडण्यासाठी मोठी संख्या दिसते.
महामार्गाची स्थिती खराब झाल्याने खड्डे चुकविण्यासाठी वाहनांची दिशा बदलताना अपघात घडत आहेत. महामार्ग प्रशासन मात्र यावर मूग गिळून गप्प आहे.
प्रवाशांना वाहनांची वाट पाहण्यासाठी सुरक्षित निवारा उभारण्याची गरज आहे. या महामर्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यालगत उभे व रस्ता ओलांडणारे नागरीक दिसत नाहीत.
दिर्घकालीन, प्रभावी उपाययोजनेची गरज
भिगवण आणि परिसरातील वाढत्या अपघातामुळे यावर दिर्घकालीन व प्रभावी उपाययोजनेची गरज नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या रचनेत बदलाची गरज तज्ञांद्वारे तपासायला हवी. या ठिकाणी वेळोवेळी जीवावर बेतणारे अपघात घडूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा सामान्य नागरीक व्यक्त करत आहेत.