गेल्या रविवारी म्हणजे जागतिक महिलादिनी ‘भारतीय महिला क्रिकेट’ संघाने T-20 World Cup च्या स्पर्धेत उपविजेतेपदावर मोहोर उमटवून खऱ्या अर्थाने तमाम भारतीय महिलांना सुखद धक्का दिला, कारण आजही भारतात महिला आणि खेळ हे समीकरण गांभीर्याने घेतले जात नाही.
खेळाच्या क्षितिजावर पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, मेरी कोम, फोगट भगिनी, सानिया मिर्झा आदि सातत्य पूर्ण कामगिरी करणाऱ्या इत्यादी मोजक्या ताऱ्यांव्यतिरिक्त अंधुक वातावरण आहे. या साठी साधनांची कमतरता तसेच सामाजिक कारणे देखील सापडतील. अनेकदा लहान शालेय मुलांच्या वाढदिवस व इतर कौतुक समारंभात मुलगा असेल तर क्रिकेट सेट, फुटबॉल, सायकल, रॅकेट आदी भेटवस्तू आणि मुलगी असेल तर तिला बाहुल्या, भातुकली, रंगसामान, मेकअप किट इ. वस्तू दिल्या जातात. त्यातून कळत नकळत “खेळ” हा उपक्रम मुलींच्या अखत्यारीतून दूर ठेवला जातो, मग खेळाचे बाळकडू मिळणार कुठून. ज्या घरांमध्ये खेळाची पार्श्वभूमी असते तिथे मुलींना शालेय अथवा महाविद्यालयीन स्थरापर्यंत प्रोत्साहन दिले जाते, परंतु पुढे योग्य मार्गदर्शना अभावे अथवा नोकरी , कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे खेळ सुटतो तो कायमचा. त्यामुळे महिलांकडून “खेळां”मध्ये करिअर हा विषय वळचणीला पडतो.
एकी कडे अशी परिस्थिती असताना, आज या साऱ्या संघर्षाला सामोरे जाऊन यशस्वी होणाऱ्या महिला खेळाडूंची उदाहरणे नक्कीच आश्वासक वाटतात. दुर्गम भागातून पुढे आलेले अथेलेट्स – हिमा दास, कविता राऊत असो अथवा लग्न आणि मातृत्वानंतरही खेळतात विजयला गवसणी घालणाऱ्या मेरी कोम, सानिया मिर्झा असोत, या real लाईफ मधील उदाहरणंसोबत reel टाईम प्रोत्साहन, जागृती करणारे – दंगल, पंगा, चक दे इंडिया इ. चित्रपटांमुळे महिला खेळांकडे पाहण्याची मानसिकता कूर्म गतीनेका होईना बदलत आहे. शासन स्थरावरूनही SAI (Sports Authority of India) मार्फत तरुणानं मध्ये खेळाची आवड निर्माण होऊन खेळातील सहभाग वाढविण्या साठी विविध कार्यक्रम राबविले जातात.
खेलो इंडिया सारख्या उपक्रमातून नवनवीन गुणवत्ता सामोरी येत आहे. या टॅलेंटला योग्य मार्गदर्शन, साधनांची उपलब्धता आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव व संधी देऊन पुढे जाण्या साठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. या द्वारे महिला खेळाला चालना मिळून त्यातून नवीन Woman Sport Icon निर्माण झाल्यास भारतात ‘महिला आणि खेळ’ हे गणित काळाच्या कसोटीवर नक्कीच उत्तीर्ण ठरेल.
अंतिमतः भारतासारख्या खंडप्राय देशात अफाट गुणवत्ता उपलब्ध असताना , योग्य नियोजन आणि उपक्रमा द्वारे प्रयत्न केल्यास, भारतीय खेळांचा आसमंत अगणित यशस्वी महिला खेळाडूंनी झळाळून उठेल.
– ऋतुजा चौगले