१९८३ च्या वर्ल्ड कप नंतर क्रीडाविश्वात आपल्या देशाने क्रिकेटला इतकं उचलून धरलं कि ऐंशी नव्वद च्या दशकातील ९९% मुलांना क्रिकेटर व्हायचं होतं. आज भारतीय क्रिकेट जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवतय, आर्थिक आणि राजकीय दोन्ही. दोनच गोष्टी प्रामुख्याने जबाबदार असाव्यात पहिली म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरी म्हणजे क्रिकेट अगोदर दुसरा कोणता खेळ तेवढा प्रसिद्ध नसणे.
२०२० मध्ये इतरही खेळ वर यायला लागलेत. पण पाहिजे तितकं प्रेम त्यांना मिळालेलं नाही कारण क्रिकेट कडून लोकांना खेचण्यात प्रचंड स्पर्धा आणि इतरही समस्या आहेत. आज किती लोकांना स्वप्ना बर्मन , माणिका बत्रा , मनू भाकर , पिंकी बालहारा आणि मलप्रभा जाधव,अंकिता रैना, अदिती अशोक(गोल्फ मध्ये जगज्जेती , राणी रामपाल(आशियाई हॉकी फायनल कॅप्टन), दीपा कर्मकार(गोल्ड मेडल इन वर्ल्ड जिम्नॅस्टिक), दीपिका कुमारी (आर्चरी वर्ल्ड कप फायनल विजेती) इ. नाव माहिती आहेत.
इतक्यात हिमा दास , दुती चंद , फोगट बहिणी, मेरी कोम,पी टी उषा , सानिया मिर्जा नंतर प्रसिद्ध झालेल्या मोजक्या महिला खेळाडू असतील. त्याला दंगल ,मेरी कोम सारखे चित्रपट जबाबदार आहेत. ज्यांनी सोशल मीडिया वर लोकांना क्रिकेटपालिकडे देशात काय चालते याकडे पाहण्यास प्रेरित केले.
सेलेब्रिटी , स्टार खेळाडू हे खेळ प्रसिद्ध करण्यासाठी तर बरचं काही करू शकतात. सरकार ही यात सहभाग देत आहे. पण तरीही लोकल स्तरावर प्रत्येक शाळेत विदयार्थ्यांना प्रोजेक्ट च्या निमित्ताने किंवा इतर उपक्रमाच्या माध्यमातून महिला क्रीडा विश्वाची कशी ओळख होईल याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरच त्या पिढींमध्ये वरील खेळाडूंची नावही सचिन , विराट सारखी प्रचलित होतील.
आणि मग आपोआपच बोर्न विटा असो की होरलेक्स किंवा सायकल यांच्या जाहिरातींमधून महिला खेळाडूही प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचतील. निश्चीतच यासाठी सर्व बाजूनं प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण सर्व प्रयत्न त्या लोकल स्तरावर केंद्रित झाले तर ते इतर लोकांपर्यंत आपोआप पाहोचतात. क्रिकेट मोठं होण्याचं प्रमुख कारण हेच आहे.
यांत वैयक्तिक स्तरावर आपण काही गोष्टी नक्की करू शकतो जसे सोशल मीडिया वर शेअर करणे , कॉलेजमध्ये महिला खेळाडू ना प्रसिद्धी देणे , किंवा फ्रेंड सर्कल च्या शर्ट बनवून त्यावर महिला खेळाडूंविषयी गौरव व्यक्त करणे. मुळात काय तर ट्रेंड तयार करणे आणि त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेणे. वातावरण निर्मिती झाली की सगळे लोक त्या दिशेने विचार करतात.
आणि आज देशात प्रचंड तरुण मंडळी असताना व त्यांच्या हातात माहिती असताना महिला क्रीडा विश्वाला एक सन्मानजनक स्थान मिळवून देणे काहीच कठीण नाही.
कदाचित उद्याच्या ऑलिम्पिक मध्ये आपल्या महिला क्रीडापटूंनी सर्वात जास्त गोल्ड जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. कारण भारतीय तरुण म्हणजे ” लाथ मारिन तिथं पाणी “…ही वृत्ती घेऊन जगणारा आहे. फक्त ही वृत्ती पब्जी किंवा टिक टॉक सारख्या धार्मिक कर्म कांडात वाया घालवू नये म्हणजे झालं. कारण आज देशात कोणत्याही क्षेत्रात काही बदल आणायचा असेल तर तरुणांशिवाय पर्याय नाही.
– शुभम मानेकर