जगदिश देशमुख
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी महत्त्वाची असते. या अन्नसाखळीत मानवाचे अस्तित्व नसले तरी कोणत्याही प्राण्याचे, वनस्पतीचे अडणार नाही; पण माणूस सोडून एखादा सूक्ष्म जीव किंवा सस्तन प्राणी नसेल तर पूर्ण अन्नसाखळीच कोलमडून पडेल. अनेक प्राणी धोक्यात आहेत आणि मानव या गंभीर समस्येबद्दल सुस्तावलेलाच आहे. आज जागतिक वन्यजीव दिन आहे त्यानिमित्ताने…
चार शतकांपूर्वी पृथ्वीतलावर मानव जातीने प्रमुख स्थान मिळविले तेव्हापासून विलुप्तीभवनाचा वेग पूर्वीपेक्षा चौपट वाढला आहे. पृथ्वीतलावरील वन्यजीवांच्या अनेक जाती नाहीशा होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. काळे हरीण, चौशिंगा, बारशिंगा, कस्तुरी मृग, जंगली म्हैस, गवा, गोरखूर (रानटी गाढव), चित्ता, गेंडा, सिंह, हंगुळ हे वन्यजीव भारतातून नाहीसे झालेले व नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. 1959-60 मध्ये भारत सरकारने ओडिशा व बिहारमध्ये प्रत्येकी एक उद्यान उभारले, तसेच महाराष्ट्रात व राजस्थानातही एक एक अभयारण्य उभारले. 1988-90 पर्यंत भारतभर शंभरापेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने उभारण्यात आली होती. असे असले तरी इतके वन्यजीव नाहीसे कसे झाले. याचे कारण म्हणजे नियोजनाचा आणि मानसिकतेचा अभाव.
भारतीय राज्यशासनाच्या वनविभागाचा 2021 मध्ये अहवाल येईल. 2011 आणि 2021च्या अहवालामध्ये किती फरक पडलाय हेही तेव्हा समजेल. पण आता 2011च्या अहवालानुसार, संपूर्ण भारतात एकूण क्षेत्रफळाच्या 23.81 टक्के म्हणजेच जवळजवळ 78.29 मिलियन हेक्टर वन्यक्षेत्र आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 77,700 चौ.कि.मी. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये 67,410 चौ.कि.मी. वन्यक्षेत्र आहे. इतर बऱ्याच देशांपेक्षा भारतात अधिक प्रमणात जैवविविधता आढळते. संरक्षित वने आणि अभयारण्ये यांच्यामार्फत भारतामध्ये वन्य संरक्षणाचा चांगला उपक्रम राबवला जातो. नियमाप्रमाणे 1 झाड तोडल्यास 10 झाडे लावली पाहिजेत असा वनखात्याचा कायदा सांगतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतर कायद्यांप्रमाणे हा कायदादेखील धाब्यावर बसवला जातो.
वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी ही एक मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होत चालली आहे. हस्तिदंत, गेंड्याचे शिंग आणि वाघाचे विविध अवयव यांचे चोरट्या व्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात या व्यापारातून दरवर्षी 35 हजार ते 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन्यजीवांच्या तस्करीमुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था यासारखे प्रश्न उपस्थित होण्याबरोबरच जंगलातील त्यांच्या अशा मुक्तसंचारामुळे जंगलात राहणाऱ्या स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या 40 वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव धोक्यात आले आहेत.
हस्तिदंतासाठी 1 लाख आफ्रिकन हत्तींची हत्या, खवले मांजर हा जगभरात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी, 10 वर्षांत गेड्यांच्या शिकारीत कमालीची वाढ झाली आहे आणि आपण मात्र वन्यजीव दिन कसा चांगल्याप्रकारे साजरा करता येईल यात दरवर्षी रमलेलो असतो.
भारतात सम्राट अशोकांच्या काळापासून (इ.स.पू. तिसरे शतक) वन्यजीव रक्षणाची जाणीव होती. त्यांनी आपल्या पाचव्या स्तंभांवर वटवाघूळ, माकड, गेंडा, साळी, वृक्ष खारोट्या इत्यादींची शिकार करू नये व जंगलात वणवे लावू नयेत, असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. कौटिलीय अर्थशास्त्रात वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ अभयारण्ये असावीत याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद आणि इतर वेदांतही त्यासंबंधी उल्लेख सापडतात. तरी वन्यजीवांच्या जाती नष्ट होत आहेत.
जगातील जैवविविधतेच्या 60 ते 70 टक्के जैवविविधता भारतात आहे. वन्यजीव ही मानवाला मिळालेली अमूल्य भेट आहे. पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीसाठी वन्यजीव व परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु दुर्दैवाने आज बऱ्याच प्राणी आणि पक्षी प्रजाती धोक्यात आहेत. शहरीकरण, शेतीसाठी मानवाने प्राणी व वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला आहे. फर, दागिने, मांस, चामड्यासाठी प्राण्यांची शिकार करणे, तस्करी करणे, त्याचबरोबर प्रदूषण, अतिक्रमण, कीटकनाशकांचा अतिवापर ही वन्यजीव नष्ट होण्याची कारणे आहेत. मानवाने औद्योगिक क्रांती व प्रगतीच्या नावाखाली वन्यजीवांपुढे व निसर्गापुढे मोठी आव्हाने ठेवली आहेत.
20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. जागतिक वन्यजीव दिनाला सुट्टी देण्यापेक्षा या दिवशी वन्यजीवाला सांभाळण्याची जबाबदारी द्यावी. वन्यजीवांच्या संरक्षणाच्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार व्हावयास हवा.