अधिकाऱ्यांना वैताग : अखेर फलक लावून केला मज्जाव
पुणे – स्वत:च्या सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवा, हे सांगायला येणाऱ्यांपेक्षा कचरा प्रकल्प कसा केला पाहिजे याची “आयडिया’ देणाऱ्यांचीच प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे या “आयडिया’ ऐकून घेण्यातच अधिकाऱ्यांचा इतका वेळ जात आहे, की त्यांनी वैतागून दारावर अशा “आयडिया’वाल्यांना मज्जाव करणारा बोर्डच लावला आहे.
सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प करणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. त्यानंतर अनेक सोसायट्यांनी “आमच्याकडे जागा नाही,’ “पाहणारे कोणी नाही,’ “दुर्गंधी येते’ असे एक ना अनेक कारण सांगत अधिकाऱ्यांना येऊन भेटणे, वशिला लावणे असे प्रकार सोसायट्यांतील पदाधिकाऱ्यांनी, रहिवाशांनी केले. मात्र, आता कचरा कसा जिरवला पाहिजे याच्या “आयडिया’ सांगणाऱ्यांची रांग घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुखांकडे लागली आहे. त्यातच त्यांचा इतका वेळ खर्ची जात आहे की, प्रशासकीय कामे मागे राहात आहेत.
त्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेर आणि स्वत:च्या खुर्चीच्या वर अशा “आयडिया’ घेऊन येणाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवू नये असे स्पष्ट लिहिलेली प्रिन्ट काढून ती चिकटवली आहे.
ज्या सोसायट्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प केले नाहीत, त्यांच्यावर सक्ती करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र सोसायट्यांनी अनेक कारणे देऊन पळवाट काढायला सुरूवात केली आहे. काही सोसायट्यांमधील सदस्यांनी नगरसेवकांना धरले असून, त्यांच्यामार्फत दबाव टाकण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
मात्र, केंद्राच्या अध्यादेशानुसार प्रत्येक सोसायट्यांमधील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुदान देण्यापेक्षा जे करत नाहीत त्यांच्याकडून कडकपणे दंड वसुली करावी, अशी मागणीही या संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.