पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची धुरा सांभाळणाऱ्या पीएमपीच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. शहरात पीएमपीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाच्या वतीने सुमारे दीड हजार थांबे तयार केले आहेत. मात्र, या थांब्यांवर पीएमपी बस निर्धारित वेळेत येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस थांब्यावर लावण्यात आलेले वेळापत्रक कालबाह्य झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करत उभे रहावे लागत आहे. याबाबत पीएमपी प्रशासन सुस्त असून, कुठलेही पाऊल उचलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
दोन शहरातील प्रवाशांना चांगली सुविधा देण्याची महत्त्वाची भूमिका पीएमपी प्रशासनावर आहे. पीएमपीने प्रवाशांना चांगली सुविधा दिली तर शहरातील सर्वांत मोठा वाहतूककोंडीचा प्रश्न सुटू शकेल. मात्र, याबाबत पीएमपी प्रशासन गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे दीड हजार पीएमपी थांबे आहेत. या थांब्यावर बस कधी येणार यासाठी पीएमपी प्रशासनाकडून वेळापत्रक लावण्यात आलेले आहे. मात्र, वेळापत्रक जुने झाल्याने व नवीन बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्याने वेळापत्रक निव्वळ नावालाच लावलेले दिसत आहे. पीएमपी थांब्यावर प्रवासी वेळापत्रक बघून उभे राहतात. मात्र, त्यानुसार बस येत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. थांब्यांवर लावण्यात आलेले वेळापत्रक कालबाह्य झाल्याने नवीन व सुधारित वेळापत्रक लावण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
याबाबत पीएमपी प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विचारले असता. ब्रेकडाऊन झालेली बस वगळता सर्व बसेस लावण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच धावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून पीएमपी प्रशासन सकारात्मक बदल न करता पीएमपीला सुधारनेचे निव्वळ स्वप्नच बघत असल्याचे दिसत आहे.
शहरातील विकृत प्रेमवीर
शहरातील प्रेमवीरांमध्ये एक विकृती दिसून येत आहे. हे प्रेमवीर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या मुलीचे नाव टाकून आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यासाठी रस्ते, बस स्टॅंड, पीएमपी बस थांबे, सार्वजनिक शौचालय, शाळा, झाडे, किल्ले या ठिकाणी मुलींची नावे टाकून परिसर विद्रूप करण्याचे कार्य करताना दिसत आहेत. अशा विकृत प्रेमवीरांचे दर्शन शहरात ठिकठिकाणी होताना दिसत आहे. अशाच एका प्रेमवीराने चक्क महापालिकेचे वेळापत्रकावरच आपल्या प्रियसीचे नाव टाकले आहे. अशा विकृत गोष्ट करणे प्रेमवीरांनी थांबविल्या पाहिजेत.