पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव ः आंबेगाव वसाहत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मंचर – विद्यार्थिनींनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. अन्याय सहन केल्यास अन्याय करणाऱ्याची मजल वाढते. रोडरोमिओंच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास त्याचा बंदोबस्त पोलीस लगेच करतील. त्यासाठी विद्यार्थिनींनी अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे मत घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी व्यक्त केले.
आंबेगाव वसाहत (ता. आंबेगाव) येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात समर्थ भारत परिवाराच्या माध्यमातून आयोजित समर्थ भारत अभियान उत्साहात पार पडले. यावेळी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव,पोलीस कर्मचारी राजेश तांबे, समर्थ भारत परिवाराचे अध्यक्ष डॉ. समीर पठाण आणि स्मिता भोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समर्थ भरताची जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे. आजचा विद्यार्थी सर्वगुण संपन्न आणि सर्वार्थाने समर्थ होऊ शकला, तरच उद्याचा भारत समर्थ भारत होऊ शकेल. म्हणून विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ भारत अभियानाचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन समर्थ भारत परिवाराच्या स्मिता भोर यांनी केले.
अभियानात विद्यार्थ्याना व्यक्तिमत्व विकास, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, आरोग्य, समाजभान, राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले, सहशिक्षक अनंता लोहोकरे यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका मनीषा आढळराव, वंदना मंडलिक, कविता ढेरंगे, लक्ष्मी वाघ, तसेच संतोष पिंगळे, गुलाब बांगर, रामदास भांड, जालिंदर देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सहशिक्षक राजेंद्र अरगडे यांनी आभार मानले.