लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांचे आरोग्य धोक्यात
संतोष पवार
सातारा – सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची एकेकाळी स्वच्छ, सुंदर शाहूपुरी, अशी ओळख होती. सध्या ही ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर असून शाहूपुरीकरांना अस्वच्छतेचा प्रश्न भेडसावत आहे. स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीकडून लाखो रुपयांचा खर्च केला जात असला तरी ग्रामपंचायत हद्दीत पाहणी केल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सातारा शहरालगतची मोठी ग्रामपंचायत आणि शांतताप्रिय म्हणून शाहूपुरीची ओळख आहे. या परिसरात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याशिवाय अभ्यासक, लेखक, विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तीही वास्तव्यास आहेत. दहा-पंधरा वर्षापूर्वी शाहूपुरीची लोकसंख्या कमी होती. आता शाहूपुरीचा विस्तार झाला आहे. आता शाहूपुरीची लोकसंख्या 35 ते 40 हजार आहे. भाडेतत्वावर असलेल्या इमारतीतून ग्रामपंचायतीची आता भव्य इमारत उभी राहिली आहे. आवश्यक कर्मचारी वर्गही आहे.
ग्रामपंचायतीची हद्द मोठी आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिकांना कमी-अधिक प्रमाणात सोयी सुविधा मिळत आहेत. मात्र, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेसाठी 19 कर्मचारी आहेत. दोन घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करण्यात येत आहे. याशिवाय फॉगिंग मशिनद्वारे औषण फवारणी करून ग्रामपंचायत रोगराई नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. बीएचसी पावडरचाही काही ठिकाणी वापर करण्यात येतो. स्वच्छतेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असला तरी “स्वच्छ, सुंदर शाहूपुरी’ या संकल्पनेला खो का बसत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. अनेक वॉर्डांमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर आहे. घंटागाड्या नियमितपणे कचरा गोळा करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेंडामाळ नाका, सनडॉन हॉटेल कॉर्नर, अंबेदरे रोडवरील अरुणोदय कॉलनीच्या फलकाजवळील कॉर्नर, शाहूपुरी पोलीस ठाण्याचा परिसर, मोळाचा ओढ्याच्या पाठीमागील मोकळी जागा, अन्य मोकळ्या जागा, नाले हे कचऱ्याचे आगार बनले आहेत. ग्रामपंचायतीकडून नियमितपणे कचरा गोळा केला जात असेल तर मग या ठिकाणी कचरा कोठून येतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओला व सुका कचरा नियमित उचलला जात नसल्याच्या अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. नवीन निर्माण होत असलेल्या वसाहतींच्या परिसरात कचऱ्याची समस्या अधिकच गंभीर आहे. घंटागाडीची वाट बघून नागरिक मिळेल तिथे कचरा टाकत असल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दुर्गंधीचा त्रास
शाहूपुरीतील कचरा समस्यमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना त्रास होत आहे. विशेषत: आंबेदरे रोड, दिव्यनगरी रोड, हुतात्मा स्मारक परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम ग्रामपंचायतीने हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कचऱ्यावरुन होताहेत वाद
ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची समस्या गंभीर आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्याने नागरिक मोकळ्या जागा, ओढे, नाल्यांमध्ये कचरा टाकत आहे. कचरा टाकण्यावरून अनेक ठिकाणी वादावादी होत आहेत. हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नयेत यासाठी ग्रामपंचायतीने कचरा निर्मूलनावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.