ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
भारताने आपल्या प्रचंड अर्थव्यवस्थेचा वापर अशा राष्ट्रांवर करावा, जे काश्मीरप्रश्नाविषयी भारतविरोधी भूमिका घेतात. गरज पडली तर व्यापारयुद्धाची तीव्रता वाढवावी लागेल. त्यामुळे मलेशियाला काश्मीरविषयी भूमिका बदलून भारताच्या बाजूने बोलावे लागेल, अशाच प्रकारच्या व्यापार अस्त्राचा वापर करून जी राष्ट्रे भारताच्या हिताविरुद्ध वागताहेत, त्यांना वठणीवर आणू शकतो. व्यापार अस्त्राचा वापर भारताने पहिल्यांदाच केलेला आहे.
भारताविरोधात सतत गरळ ओकणारे मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांना आता उपरती झाली आहे. भारताने मलेशियाच्या पाम तेलावर टाकलेल्या बहिष्काराला प्रत्युत्तर म्हणून आपण काहीही करू शकत नाही. भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेसमोर मलेशिया कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आपण प्रत्युतरादाखल कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधावा लागेल, असं 20 जानेवारीला ते म्हणाले.
भारत खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे, तर मलेशिया भारतासाठी खाद्यतेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. पण मलेशियाच्या पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारतावर टीका केली होती. प्रत्युत्तर म्हणून भारताने मलेशियाकडून आयात होणारं पाम तेल रोखलं होतं. आयात बंद केल्यामुळे मलेशियाच्या अर्थव्यवस्थेलाही हादरा बसला आहे. मलेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरही मलेशियाच्या पंतप्रधानांनी टीका केली होती. परिणामी गेल्या आठवड्यात मलेशियन खाद्यतेलाचे दर 10 टक्क्यांनी घसरले, जी गेल्या 11 वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे.
मलेशिया फक्त भारताविरोधातील वक्तव्यापुरताच मर्यादित नाही. वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकलाही मलेशियाने शरण दिली आहे. झाकीर नाईकचं स्थायी नागरिकत्व मागे घेण्याची विनंती भारताने केली होती, जी मलेशियाने फेटाळून लावली. यामुळेही भारत नाराज आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो फरार असून मलेशियात स्थायिक आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 8 जानेवारीला सूचना जारी करत मलेशियातून केल्या जाणाऱ्या रिफाइंड पाम तेलाच्या आयातीला “मुक्त’ ऐवजी “वर्जित’ श्रेणीत वर्ग केले. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला सरकारने कलम 370 रद्द केले. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद भारताविरोधात बोलले. भारताने काश्मीरवर बेकायदेशीर कब्जा केला, भारताचा काश्मीरवरील हक्क अधिकृत नाही, असे महाथीर म्हणाले.
मलेशियाला योग्य शब्दांत समज
भारतीय संसदेने नुकताच पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातील धर्माच्या आधारे भेदभावाची, शिकार झालेल्या हिंदू व अन्य अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. लगेचच मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी काश्मीरप्रमाणे या मुद्द्यावरही तोंड उघडले व भारतातील मुस्लिमांची सुरक्षा धोक्यात आल्याचे ते म्हणाले. भारताने त्यावरही आक्षेप घेतला. मात्र, त्याचा मलेशियाच्या पंतप्रधानांनावर काही असर झाला नाही.
गेल्या वर्षी मे महिन्यात सत्तांतर होऊन 94 वर्षांचे महाथीर मोहम्मद पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. महाथीर पंतप्रधान झाल्या झाल्या नरेंद्र मोदींनी मलेशियाला धावती भेट देऊन ताणले गेलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले होते. मात्र तरीही मलेशियाने भारतविरुद्ध भूमिका घेतली.
पाम तेलाची आयात इंडोनेशियामधून
जगातील पाम तेलाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांत इंडोनेशिया आणि मलेशियाचा समावेश होतो. इंडोनेशिया दरवर्षी 4.3 कोटी टन पाम तेल उत्पादित करतो, तर मलेशिया 1.9 कोटी टन. मलेशियाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पाम तेल व्यापाराचा वाटा 2.5 टक्के इतका तर निर्यातीतला वाटा 4.5 टक्के इतका आहे. भारताला दरवर्षी 90 लाख टन पाम तेलाची आवश्यकता असते. त्यापैकी 70 टक्के आयात आपण इंडोनेशियाकडून करतो, तर 30 टक्के आयात मलेशियातून. आता मात्र भारत सरकारच्या निर्णयामुळे मलेशियातून पाम तेलाची आयात केली जाणार नाही, त्याचा विपरीत परिणाम मलेशियावरच होईल. इंडोनेशियादेखील भारताला अधिकाधिक तेलविक्री करू इच्छितो.
एखाद्या देशाच्या न पटणाऱ्या राजकीय भूमिकेवर भारताने प्रथमच व्यापाराच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवून दिली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्येसुद्धा व्यापारयुद्ध सुरू आहे. जिथे व्यापाराचा शस्त्रासारखा वापर होत आहे. पाम तेल हे मलेशियाचे कृषी निर्यातीचे सर्वात मोठे उत्पादन आहे. भारताने जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान मलेशियाकडून 3.9 दशलक्ष टन म्हणजे 2 अब्ज डॉलर पाम तेलाची खरेदी केली.
मलेशियाविरुद्ध पर्यटन युद्ध
भारतातून अनेक पर्यटक पर्यटनासाठी मलेशिया, सिंगापूर आणि दक्षिण पूर्वेकडील विविध देशांत जातात. गेल्या वर्षी तीन कोटींहून अधिक पर्यटक भारतातून परदेशात पर्यटनास गेले होते, जर मलेशियाला धडा शिकवायचा असेल तर भारतीयांनी कुठल्याही इतर देशांत पर्यटनाला जाण्यावेळी मलेशियन एअरलाइन्सने जाऊ नये किंवा मलेशियाच्या क्वालांलपूरच्या विमानतळावरून उड्डाण करू नये. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण करताना पाकिस्तानची बाजू घेत काश्मीरविषयी जे वक्तव्य केले, त्यानंतर ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर भारतीयांनी एकमेकांना टॅग करून आवाहन केले की, मलेशिया जोपर्यंत त्यांचे मत बदलत नाही, तोपर्यंत मलेशियात पर्यटनाला किंवा कोणत्याही कारणास्तव भेट देऊ नये.
मलेशियाचे मोठे आर्थिक नुकसान
भारत एक प्रचंड मोठी आर्थिक व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारताने मलेशियाकडून पाम तेल आयात करणे बंद केले, तर मलेशियाला मोठा धक्का बसणार आहे. भारताला खूश करण्यासाठी मलेशियाने असेही म्हटले आहे की, भारताकडून मलेशियात येणाऱ्या वस्तूंची आयात वाढावी यासाठी भारताकडून साखर विकत घ्यायला मलेशिया तयार आहे, जेणेकरून मलेशिया-भारत यांच्या व्यापारात समतोल निर्माण होईल. याचाच अर्थ असा की, मलेशियन सरकारला काश्मीरविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या वादाची कल्पना आलेली आहे.