आव्हान म्हणून स्विकारल्यास स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल
– शरद पवारांना विश्वास
मुंबई : चैत्यभूमीवर कोट्यावधी आंबेडकरी जनतेची श्रद्धा आहे. आता चैत्यभूमीच्या शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. त्यामुळे चैत्यभूमी व स्मारकाचा उत्तम संगम पाहायला मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीने हाती घेतलं आहे.
पण या कंपनीने स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारले तरच हे स्मारक दोन वर्षांत पूर्ण होईल, असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने इंदू मिल येथील स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंच पुतळा उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
शरद पवार यांनी आज इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. त्यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी करीत एमएमआरडीएचे अधिकारी तसेच ठेकेदारांकडून कामाची माहिती घेतली. त्यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, चैत्यभूमी आणि डॉ. बाबासाहेबांचे स्मारक असा दुहेरी संगम आंबेडकरी जनतेला पहायला मिळेल. हे स्मारक मुंबईसह महाराष्ट्राच्या दृष्टीने जागतिक पातळीवरील एक आकर्षणाचे महत्त्वाचे ठिकाण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नाही तर श्रीलंका, चीन, थायलंड यासारख्या बौद्ध धर्मीय अधिक संख्येने असलेल्या देशातील नागरिकांसाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरणार आहे.
स्मारक उभारणीच्या जवळपास सर्व मान्यता घेण्यात आलेल्या आहेत. स्मारकाच्या कामात कुठलेही अडथळे आणि परवानग्या शिल्लक राहिल्या नसतील तर दोन वर्षात हे काम करणे अशक्य नाही. मात्र त्यासाठी ठेकेदार असलेल्या वैंपनीने हे आव्हान समजून हे काम स्विकारले पाहिजे. त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले तर मला खात्री आहे की हे दोन वर्षात हे स्मारक पूर्ण होऊन पाहण्याची संधी मिळेल.
हे स्मारक महाराष्ट्र, मुंबई परिसराच्या दृष्टीने एक महत्वाचे आकर्षण झाल्याशिवाय राहणार नाही. जगभरातील बौद्ध अनुयायी तसेच आंबेडकर प्रेमी जनताही या स्मारकाला मोठ्या संखेने भेट देतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. याआधी 6 डिंसेंबरचा महापरिनिर्वाणदिन व 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी प्रामुख्याने चैतन्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र या दिवसांव्यतिरिक्तही स्मारक झाल्यानंतर गर्दी वाढेल, असे ते म्हणाले.
सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीकडे पहिल्यांदाच आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीकडे आल्याच्या काळातच एवढं मोठं काम सरकारच्या हातून घडत आहे. याआधी आघडीचे सरकार असताना इंदू मिलच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात भूमिपूजन झालं आहे. पण त्यानंतर काय झाले, यात जायचे नाही, पण पुन्हा आमच्याच काळात हे काम पूर्ण होत आहे.
या महत्त्वाच्या कामासाठी हातभार लागत आहे, त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडेही खूष आहेत. हे एक आव्हान हे सरकार पूर्ण करीत असल्याचा अभिमान असल्याचेही शरद पवार म्हणाले.
जेएनयू सारखी विद्यापीठे उभारण्यास सरकार सक्षम
स्मारकाऐवजी अन्य विकासकामांवर निधी खर्च करायला हवा होता, असे मत काही लोकांनी व्यक्त केल्याबद्दल शरद पवार म्हणाले, आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आम्ही जे बोलतो ते केलेच पाहिजे असे वाटणारा वर्गही मोठा आहे. पण जे आवश्यक आहे तेच केले जाते. जेएनयूसारखे विद्यापीठ इंदूमिलमध्ये झाले असते. या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देताना आपल्या राज्यात एक कृषि विद्यापीठ करण्याची मागणी झाली, तेव्हा चार कृषि विद्यापीठे उभी राहिली. त्याचप्रमाणे जेएनयूसारखं विद्यापीठ उभारायचे झाले तर त्यासाठी हे सरकार सक्षम आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.