मराठी कादंबरीविश्वात अनेक लेखकांनी अनेक पात्रे आपल्या लेखणीने जिवंत केली. ही पात्रे वर्षानुवर्षे वाचकांसोबत वावरत आहेत. ही शब्दामधून पानावर आलेली आणि पानावरून मनावर पसरलेली वेगवेगळी पात्रे या सदराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पुन्हा एकवार पोहचविण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. सुमारे 68 वर्षांपूर्वी “गारंबीचा बापू’ ही कादंबरी लिहून थोर कादंबरीकार ना. पेंडसे यांनी मराठी साहित्यात खळबळ उडवून दिली. मराठी कादंबरीविश्वात असाही ऐवज निर्माण होऊ शकतो, याची जणू नव्याने खात्री पटवून देण्याचे काम या कादंबरीने पार पाडले.
प्रादेशिकतेचा शिक्का असलेली ही कादंबरी महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात त्या त्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर घडणे शक्य होते, फक्त निसर्ग, त्या निसर्गाला अनुरुप माणसे, भाषा, वेशभूषा आणि पारंपरिकता बदलू शकणार होती.
दंबरीच्या मुख्य पात्राचे नाव हेच कादंबरीच्या शीर्षकामध्ये आलेले असल्याने बापूविषयी प्रारंभालाच अनेक प्रश्न वाचकाला पडणे स्वाभाविक होते. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पेंडसे यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने कोकणातील मराठीचा डौल सांभाळत दिल्याचे दिसून येते.
गारंबीत खरे तर दोन बापू. पहिला तो सपाट आणि दुसरा वाचकांच्या मनावर सहा दशके अधिराज्य गाजविणारा कादंबरीचा खराखुरा नायक तो म्हणजे अफाट बापू! या बापूचं जीवनच कलंदराचं. जन्मापासून जे जे त्याच्या आयुष्यात घडत गेलं ते कधी सरळ-एकमार्गाने-सुखासुखी-संघर्षाशिवाय झालेलंच नाही. सारं काही वळणावळणाचं, चढाचं आणि कमालीचं संघर्षमय असणारं. पण त्यामुळेच बापू नावाचं जिवंत सोनं लखलख करीत सातत्याने चमकत राहिलं. या बापूला “अफाट’ म्हणणाऱ्या गारंबीलाच खरं तर सलाम करावयास हवा.
विठोबा बापूचा बाप, सरळमार्गी माणूस. बायको देखणी पण फटाकडी. त्यामुळे विठोबाचं विश्व म्हणजे बापूच. बापूचे सारे काही करायचे हेच त्याचे ध्येय, अण्णा खोताकडे पडेल ते काम करणे हे त्याच्या नशिबी. बापूच्या आईवर खोताचा डोळा आणि तिचेही चारित्र्य घसरण्याच्या वाटेवर पुढे पुढे जाणारे. त्यामुळे सहा महिन्यांचा असल्यापासून बापूचे संगोपन विठोबाने आई काय करेल एवढ्या मायेने केले होते. बापूवर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे त्याची भूतवाडीची मावशी. आईशी बापूचे अजिबात जमायचे नाही आणि मावशीचा शब्द बापू खाली पडू द्यायचा नाही. बाराव्या वर्षी बापूची अण्णांच्या नातवासोबत मुंज साजरी झाली. बापू शाळेत जाऊ लागला तेव्हा दिनकर हा गोपाळनानांचा मुलगा बापूचा मित्र झाला पण बापूचे उद्योग बघून नानांनी दिनकराला भूतवाडीला पौरोहित्य शिकण्यासाठी पिटाळले. हा दिनकर बापूची साथ अखेरपर्यंत देताना दिसतो.
बापूला कमी वयातच गारंबी घाबरायला लागली. त्याचे छाती काढून चालणे, स्पष्ट बोलणे, तार्किकतेच्या पलीकडचे वागणे हळूवारपणे पण स्पष्ट रीतीने गारंबीच्या नजरेस येऊ लागले आणि येथून “बापू’ हे काही वेगळंच पाणी आहे याची गारंबीची खात्री पटली. आईची स्पष्ट शब्दात खरडपट्टी काढणाऱ्या बापूची कुणबी-माळी गुरवात उठबस होती. विठोबाच्या घराजवळ वणदे नदी होती. विठोबा सकाळी बाहेर गेला की अंमळ उशिराने बापू बाहेर गाणी गात गात बाहेर पडे. बापूच्या गाण्याच्या लकेरी कानावर पडल्या की अंगणात काम करणाऱ्या वा पाण्याला जाणाऱ्या बायका आपोआप बाजूला होत. बापूवर एकदा गावातल्या यमीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप असल्याचे किटाळ आले आणि तेथून बापू अधिकच बिथरला. हे किटाळ अण्णा खोताने त्याच्यावर आणले होते. हे किटाळ दूर झाले पण बापूच्या मनावर पडलेला चरा मात्र दूर झाला नाही.
गावात अण्णांचे जावई सपाट बापू आले आणि गारंबीचे पुढारी झाले. त्यांनी वणदे नदीच्या पुलावर हॉटेल उघडले. ते चांगले चालायला लागले. हे बापू बोलण्यात पटाईत. याच पुलावर रावजी या इसमाचेही हॉटेल होते. आश्रयासाठी आलेल्या बापूला सपाट बापूंनी हाकलले आणि बापू रावजीकडे गेला. यमीच्या प्रकरणानंतर कायापालट झालेल्या बापूचा उपयोग रावजीला होऊ लागला. रावजीच्या हॉटेलमध्ये बसून बापू गावोगावच्या लोकांशी संपर्क ठेवू लागला आणि रावजीचे हॉटेल बेफाम चालू लागले.
पलीकडच्या सारखरपेंडीला मुसाशेठ हे एक मोठे प्रस्त होते. या मुसाशेठला एकदा भरबाजारात बापू भिडला आणि बापू खरोखरीच अफाट आहे याची खात्री पटली. बापूमुळे रावजीचा धंदा वाढला आणि बापूच्या जीवनात राधाचा प्रवेश झाला. राधा ही रावजीची बायको. देखणेपण कसं असावं तर राधेसारखं. मूर्तिमंत सौंदर्य राधेच्या रुपाने-देहाने गारंबीत रावजीच्या घरी वावरत होतं. रावजीसारख्या दळभद्री माणसाच्या नशिबी राधारुपी सौख्य नांदावं हे म्हणजे अतिच होतं. बापूचा अफाटपणा राधाच्या लक्षात आला. एक मनस्वी, कलंदर, शब्दासाठी जीव द्यायला तयार होणारा, गारंबीवर जीव टाकणारा, प्रसंगी वाघाशी लढायला सज्ज होणारा बापू राधाच्या काळजाचा तुकडा बनला. रावजी असतानाच बापूवर ती प्रेम करू लागली. पण लवकरच बापू मुसाशेठकडे कामाला लागला. सुपारीच्या व्यापारातले बारकावे त्याने आत्मसात केले आणि उद्याच्या व्यापार विश्वात बापू हे नाव झळकण्यास प्रारंभ झाला.
रावजी अचानक मेला आणि राधासोबत बापू राहू लागला. गारंबीला हा धक्का होता. पण धक्का देणं हेच बापूचे वैशिष्ट्य होतं. एक दिवस बापूच्या मनाला मोठा धक्का बसणार होता. बापूचा जीव की प्राण असलेला विठोबा साकव मोडून नदीत पडला आणि गतप्राण झाला. बापूला वेड लागायचेच बाकी राहिले. यानंतरचे सहा महिने भ्रमिष्टावस्थेत पार पडले. बापू हळूहळू ताळ्यावर आला. गारंबीचे लोकदैवत व्याघ्रेश्वर हे बापूसाठी कमालीचे श्रद्धेचे स्थान. या व्याघ्रेश्वराला साक्षी ठेवून बापूने अनेक गोष्टी केल्या होत्या. राधाकडे बापूचे राहणे आईला मान्य नव्हते. पण तो कुणाचेच ऐकणार नव्हता.
रावजीच्या हॉटेलपेक्षाही बापूला वेगळे काही करावयाचे होते. मोठे होणे हे त्याचे ध्येय होते. बापूने पुलावर वखार काढली आणि तेथून बापू सुसाट निघाला. लक्ष्मी बापूच्या घरी पाणी भरू लागली. बापूने गारंबीला मोठा बंगला बांधला. ज्या साकवावरून विठोबा मेला तेथे पूल बांधला, विठोबाच्या नावाने विहीर बांधली. बापूचे वैभव दिवसेंदिवस वर्धिष्णू होत गेले. बापूसाठी दिनकरचा जीव तुटे. राधा-बापू लग्नाशिवाय राहत आहेत, हे गारंबीसाठी आक्रितच होते, पण दोघांनी सूर्यनारायणाला साक्षी ठेवून एकमेकाला कधीच वरले होते. दरम्यान, राधाला दिवस गेले आणि एक गोंडस बालक जन्माला आले, त्याचे नाव बाळ. आता बापूची वाटचाल दिवसेंदिवस विस्तारतच चालली होती. अण्णा खोताशी उभा दावा घेऊन गावातल्या गुरवांशी हात मिळवणी करणाऱ्या बापूने राधाच्या सोबतीने गावासाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या. गावातला जातीयवाद त्याला संपवायचा होता पण त्यासाठी अनेक अडचणी उभ्या होत्या. कितीही संकटे आले तरी बापू खचला नाही, थकला नाही आणि हरलाही नाही. आई बापूचे वैभव बघण्यासाठी आली नव्हती, ती शेवटच्या टप्प्यात बापूकडे आली आणि तीही एखादे वादळ यावे तशी. तिच्या चुका आणि अण्णा खोताने दिलेला धोका साऱ्यांना सांगत ती बापूकडे आली कारण आता तिला गावचे सरपंचपद बापूकडे यावे असे वाटू लागले होते.
येथे या कादंबरीचा शेवट होतो. बापू हे पात्र सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनाचा ताबा घेते आणि त्याची झिंग शेवटपर्यंत उतरत नाही. एकंदरीत “गारंबीचा बापू’ मराठी वाचकासाठी त्याच्या कुटुंबातला एक घटकच होऊन जातो यात शंका नाही.
डॉ. विनोद गोरवाडकर