पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वातानुकूलित शिवशाही बसची दुरवस्था झाली आहे. अनेक शिवशाहीच्या बसमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे दिसत आहे. यामुळे शिवशाही बसच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने प्रवाशांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे.
राज्यभरात साध्या (लाल) व निमआराम (हिरकणी) बस कमी करून महामंडळ शिवशाही व इतर बस प्रवाशांच्या माथी मारत आहे. मात्र, शिवशाही बसची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अनेक शिवशाही गाड्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी, आग विझविण्याचे फायर सिलेंडर नसल्याचे दिसून येते. यामुळे, प्रवासादरम्यान एखादा अपघात झाल्यास तत्काळ उपचार मिळत नाही. तसेच, अनेक बसमध्ये सीसीटीव्ही नसल्याने गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.