केंदूर – खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणातून रब्बी हंगामासाठी या वर्षात पहिले आवर्तन शुक्रवारी (दि. 10) सुमारे 45 दिवसांचे सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचे वितरण ‘टेल टू हेड’ या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धरणामध्ये सद्यस्थितीत सुमारे 8.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच एकूण पाणी साठ्यापैकी 96.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे 51.05 इतका अधिक पाणी साठा शिल्लक असल्याने किमान यावर्षी तरी व्यवस्थित नियोजन होईल आणि उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासणार नाही अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा नियोजन समितीच्या बैठकीत 10 जानेवारी रोजी चासकमानच्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि. 10) आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे.
धरणातून सुमारे 550 क्युसेकने कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. पहिले आवर्तन 45 दिवसांचे असले तरी किमान 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरुवातीला पहिले दोन दिवस मुखई येथून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान वेळ नदीला सोडलेले पाणी आज (दि. 12) बंद करून पुढे सोडण्यात आले आहे. अशी माहिती शाखा अभियंता सचिन शिंदे यांनी दिली.