चालकांकडून सुरक्षेसाठी घेतली जाणार लेखी शपथ
पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षा मोहिमेंतर्गत शनिवार (दि. 11) पासून सुरक्षा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी महामंडळाच्या वतीने नेहमीच वेळोवेळी उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून यंदा जानेवारी महिन्यातील रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अपघात व सुरक्षितता यावर आणखी उपाययोजना करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड, वल्लभनगर येथील एसटीच्या वाहक व चालकांना शपथ देण्यात येणार आहे. वल्लभनगर आगारात सुमारे 90 चालक व वाहक आहेत.
यंदा वल्लभनगर आगारात चालकांकडून सुरक्षेसाठी लेखी शपथ लिहून घेण्याचा आगळा-वेगळा उप्रकम राबविण्यात येणार आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून आगारातील अपघाताचे प्रमाण घटले असल्याचा दावा आगार प्रमुखाने केला. तर, येत्या काळात अपघात होऊच नये यासाठी आगार प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.
सुरक्षित प्रवाशांना प्रवास व्हावा यासाठी सर्व चालक जागरूक असणे आवश्यक आहे. यासाठी कार्यशाळेतून बाहेर पडणारे प्रत्येक वाहन मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबाबत खात्री करणे आवश्यक असल्याचे मोहीम अंतर्गत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या मोहिमे अंतर्गत चालक, वाहकांची वैद्यकीय तपासणी, डोळे तपासणी व सामाजिक संस्थेच्या वतीने वैद्यकीय व मानोसोपचारासाठी शिबिर घेण्यात येणार आहे.