श्रीनिवास पाटील यांचे आवाहन; पुसेगावला सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
पुसेगाव – “”जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू या. मी आणि खा. रणजित मिळून दोघांनी जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळ जवळ मिटवत आणला आहे. केवळ खटावच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर घालण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी पक्षविरहीत व प्रामाणिकपणे काम केले तर जिल्ह्यातील खास करून दुष्काळी भागातील मुलभूत समस्यांचे संपूर्ण निराकरण 2022 पर्यंत निश्चितपणे होईल,’ असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
पुसेगाव (ता. खटाव ) येथे सेवागिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना नेते नितीन बानुगडे- पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, माजी महसूल अधिकारी चंद्रकांत दळवी, प्रांताधिकारी अश्विनी जिंरंगे,तहसीलदार अर्चना पाटील, तालुका पंचायत समिती सभापती कल्पना मोरे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव, कृषी अधिकारी महेश झेंडे, विनायक पवार, सरपंच पाटोळे, उपसरपंच चंद्रकांत जाधव, युटीलीटी इव्हेंटचे व्यवस्थापक रणजित पांड, माला पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री पाटील म्हणाले, “”जिहे- कटापूरचे उर्वरीत काम मार्गी लागावे, म्हणून व पुसेगाव व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांबरोबर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांची बैठक घडवून आणूया.’
यामध्ये कोणताही श्रेयवाद न आणता विकासाचा ध्यास घेऊन एकमेकांच्या हातात हात घालून काम करू या, असे आवाहन यावेळी केले. बानुगडे-पाटील म्हणाले, “”सेवागिरी यात्रा केवळ भक्ती मार्गाचाच अवलंब करतानाच सुधारणा मार्गाचा, आधुनिकतेची कास धरते. ट्रस्टच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा ट्रस्ट उपलब्ध करत आहे.
जिहे-कटापूर योजना बारमाही कशी होईल, यावर प्रयत्न करण्यात येईल तसेच कोयनेचे वाया जाणारे पाणी माण- खटावच्या दुष्काळी भागाला करण्याबाबत युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात यतील.” आमदार महेश शिंदे म्हणाले, “”अलिकडच्या काळात पिकांवर होत असलेल्या रासायनिक खतांच्या भडीमारामुळे कॅन्सरसारखे आजार आज बळावत आहेत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्याची गरज आहे.” लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “”लोकप्रतिनिधी म्हणून गेली दहा वर्षे या भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मी सातत्याने काम करत आलो आहे. आघाडी शासनाच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जिहे- कटापूरचे काम वेगाने झाले.
मात्र, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्यात अद्याप अपयश आले. याला कारण श्रेयवाद नडला.” एक वर्षाच्या आत या भागात पाणी खळाळलेच पाहिजे, नाहीतर या शासनाला गप्प बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ऑस्ट्रलियात संशोधनासाठी निवड झाल्याबद्ल पुसेगाव येथील सागर धनंजय जाधव याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले. प्रास्ताविक जाधव यांनी केले तर आभार योगेश देशमुख यांनी मानले.