पुणे – भारताची ताकद जगाला दाखवण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी केले आहे. अटलजींमध्ये उत्तम प्रशासक, कणखर नेतृत्वाचे गुण असल्याने भारत अणुचाचणी संपन्न देश झाल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
आधार सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित “अटलशक्ती पुरस्कार’ डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना तर, “अटलसाधना पुरस्कार’ ठाकूर बंधू, सरपाले बंधू, संजय करंदीकर, डॉ. संतोष भन्साळी, मंदार रांजेकर यांना फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे, फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप काळोखे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी मंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “अटलशक्ती’ व “अटलसाधना’ पुरस्कारारांनी प्रेरणादायी लोकांचे काम समोर आले. अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी योजनांतून देशभरातील खेडेगाव एकमेकांना जोडण्याची काम केले. अटलजी यांनी विषम परिस्थितीत देशाला ताकद देण्याचे काम केले आहे. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने पुरस्कार्थींना समाजात नव्याने उर्मी मिळणार आहे.